कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, अर्णब गोस्वामींच्या अटकेवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम | 04 Nov 2020 12:05 PM (IST)
अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, "कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल."
मुंबई : "कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल," अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर दिली आहे. अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपच्या नेत्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा विरोध केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्यावरील अटकेची कारवाई ही सूडबुद्धीने केल्याचं अनेक नेत्यांनी म्हटलं आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन ते चार वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख म्हणाले की, कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल. ही केस बंद झाली होती. अन्वय नाईक यांच्या पत्नीने कोर्टात अर्ज केला होता. त्यानंतर ही केस रिओपन करण्याची परवानगी कोर्टाने त्यांना दिली." अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामींना अटक पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. रिपब्लिक टीव्हीची बाजूआज संपूर्ण देशात महाराष्ट्र पोलिसांची कारवाई पाहिली. सकाळी 7.45 वाजता रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या घरी महाराष्ट्र पोलीस घुसले. जबरदस्तीने कॅमेरे बंद केले. अर्णब गोस्वामी यांना धक्काबुक्की केली आणि घरातून फरफटत नेत पोलीस व्हॅनमध्ये बसवलं.हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे. भारतातील एका वृत्तवाहिनीच्या संपादकाला केसांना पकडून फरफटत नेऊन अटक केली जाते. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पोलिसांनी कॅमेरे बंद केले आणि अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली. सासू-सासऱ्यांना औषधं देण्यासही पोलिसांनी अर्णब यांना रोखलं. शिवाय त्यांच्या मुलालाही धक्काबुक्की केली. सोबतच त्यांनी लेखी कायदेशीर नोट रेकॉर्डवर ठेवण्यास परवानगी नाकारली. कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांनी भारताच्या प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या संपादकाला ओढत नेलं, जसं की ते गुन्हेगार आहेत. अर्णब यांना आधी कोणतंही समन्स बजावलं नाही आणि कायदेशीर टीमला भेटूही दिलं नाही."मी काय करु शकतो हे तुला माहित नाही," असं पोलीस पथकाचे अधिकारी सचिन वझे अर्णब गोस्वामी यांना म्हणाले. मी सहकार्य करेन असं वारंवार सांगूनही कोणतीही प्रक्रिया न करता अर्णब गोस्वामी यांना क्राईम ब्रान्च युनिटकडे सोपवलं आणि त्यांना धक्काबुक्की केली.सशस्त्र पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना धक्काबुक्की करुन पोलीस व्हॅनमध्ये ढकललं. अर्णब गोस्वामी म्हणाले की, "त्यांनी मला मारहाण केली. त्यांनी मला शारीरिक धक्काबुक्की केली. आमच्यासाठी लढा, असं मला भारताच्या लोकांना सांगायचं आहे. माझ्या मुलाला मारहाण केली."मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार अधिकाराचा आणि वर्दीचा वापर करुन हल्ला करत आहे. हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय किंवा तथ्याशिवाय बंद झालेली केस पुन्हा ओपन करुन केवळ अर्णब गोस्वामी यांना वॉरंटशिवाय अटक करणं हे धक्कादायक आहे. भारत त्याविरोधात उभा राहणार आहे.एन्काऊंटर कॉप आणि परमबीर सिंह यांचा उजवा हात असलेल्या सचिन वझे यांनी रिपब्लिक टीव्हीला सांगितलं की, "आयपीसीच्या कलम 306 अंतर्गत अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे." 2018 मधल्या एका आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी केली होती आणि कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करुन असं काहीही घडलं नसल्याचं सांगितलं.सत्तचे गैरवापर करणाऱ्या, कायदा पायदळी तुडवणाऱ्या आणि माध्यमांची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांचा रिपब्लिक टीव्ही निषेध करते. फेक टीआरपी स्कॅमवरुन रिपब्लिक टीव्हीच्या न्यूजरुममध्ये पोहोचण्याची मुंबई पोलिसांची दुष्ट बाजू समोर आली. आता कोर्टाने बंद केलेल्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक धक्कादायक आहे.आम्ही भारताच्या नागरिकांना, माननीय कोर्टाला आणि वरिष्ठ संस्थांना आवाहन करतो की, "त्यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रातील आणीबाणीविरोधात उभं राहिलं पाहिजे. या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन आम्ही करतो. रिपब्लिक मीडिया नेटवर्क शेवटपर्यंत लढत राहणार आहे आणि सत्याचा विजय होईल यात शंका नाही. सत्य कधीच पराभूत होत नाही."संबंधित बातम्या