मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अर्णब गोस्वामींच्या अटेकवरुन महाराष्ट्र सरकार विरुद्ध भाजप अशी जुंपली आहे. अमित शाहांपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी अर्णब यांच्या अटकेचा निषेध केला आहे. तसंच महाराष्ट्रात ही अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.


केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे की, काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी लोकशाहीला पुन्हा एकदा लज्जित केले आहे. रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरूद्ध राज्य सत्तेचा स्पष्टपणे गैरवापर करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. ही घटना आणीबाणीच्या परिस्थितीची आठवण करून देते. पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर हा हल्ला आहे, याचा प्रतिकार केला जाईल, असं शाह यांनी म्हटलं आहे.





विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम आहे.  आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.





भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, ज्या पद्धतीने अर्णव गोस्वामी यांना अटक झाली ते निषेधार्ह आहे, भाजप रस्त्यावर उतरून या आणीबाणी सदृश स्थितीचा विरोध करेल. लोकांनी इंदिरा गांधी यांचा अहंकार मोडून काढला होता. त्यामुळे काँग्रेस ने त्या तोऱ्यात राहू नये.. पत्रकार जगाने या घटनेचा निषेध करायला हवा. आज अर्णब जात्यात आहे तर तुम्ही सुपात आहात. तुम्ही लोकांवर टीका केली तर चालते, तुमच्यावर टीका केलेली चालत नाही, जरा सहनशक्ती वाढवा, असं पाटील यांनी म्हटलं आहे.





केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे, महाराष्ट्र सरकार सूडबुद्धीने कारवाई करताय, पोलिसांनी बंद केलेली केस उकरून काढत केलेली ही कारवाई पत्रकारांवरचा हल्ला आहे, असं त्यांनी म्हटलं. भाजप नेते विनय सहस्त्रबुद्धे यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात सध्या सत्तेत असलेल्या सर्व पक्षांनी आणीबाणीचे समर्थन केलं होतं. हा योगायोग नाही, हे त्याच वृत्तीचे आहेत. महाराष्ट्रात ही अघोषित आणीबाणी आहे. एरव्ही व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या लोकांनी आपलं मन यावर सोडावं. प्रेस कौन्सिल आणि एडिटर्स गिल्ड यासारख्या संस्थांनीही ही या कारवाईचा निषेध करण्यासाठी समोर यायला हवं, असं त्यांनी म्हटलं आहे.


आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की,  एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णींना अटक केली गेली.  सरकार विरोधात सोशल मिडियावर बोलणाऱ्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले आहे. आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या... वा रे वा लोकशाही सरकार! काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस... महाराष्ट्र आणीबाणीच्या दिशेने? असं शेलार यांनी म्हटलं आहे.


'सोनियासेना किती तोंडं बंद करणार?', अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर कंगनाचा सवाल


काय म्हणाली कंगना


अर्णब यांच्या अटकेनंतर कंगनाने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात कंगनाने तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती तोंडं बंद करणार आहात? असा सवाल केला आहे.  तिने म्हटलं आहे की, “मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे, तुम्ही अर्णब गोस्वामी यांच्या घरात घुसून मारलं आहे, केस ओढले. तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती गळे दाबणार आहात? किती आवाज बंद करणार आहात?, असा सवाल तिनं केलाय.


कंगनाने यावेळी पुन्हा एकदा सोनियासेना उल्लेख करत, “सोनियासेना किती तोंडं बंद करणार आहात? ही तोंडं वाढतच जाणार आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती जणांचा बळी दिला गेला. एक आवाज बंद केला तर इतर आवाज उठतील, असं कंगनानं म्हटलं आहे. पेंग्विन म्हणाल्यावर राग का येतो. पेंग्विनसारखं दिसतात तर म्हणणार ना…वडिलांच्या पप्पूसारखं काम केलं तर पप्पूच म्हणणार ना..सोनियासेना म्हटल्यावर राग येतो का…तुम्ही आहात सोनियासेना, असंही कंगनानं म्हटलं आहे.


Arnab Goswami Arrest | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक


काय आहे प्रकरण


पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.


सकाळी काय घडलं?
आज पहाटे पाच वाजता रायगड पोलीस मुंबई पोलिसांच्या टीमसह अर्णब गोस्वामी यांच्या वरळीतील घरी पोहोचले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना घरातच घुसू दिलं नाही. त्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी दीड तास पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यांच्या पत्नीने हे सगळं कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं आणि संपूर्ण व्हिडीओ चॅनलवर दाखवला. अटक वॉरंटनुसारच पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई केली. सात-साडेसातच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आलं. एखाद्याला अटक केल्यानंतर दुसऱ्या हद्दीत नेण्यापूर्वी डायरी करावी लागते. त्यानुसार ना म जोशी पोलीस स्टेशनमध्ये डायरी केल्यानंतर पोलीस त्यांना अलिबागला घेऊन गेले.


रिपब्लिक टीव्हीची बाजू
आज संपूर्ण देशात महाराष्ट्र पोलिसांची कारवाई पाहिली. सकाळी 7.45 वाजता रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या घरी महाराष्ट्र पोलीस घुसले. जबरदस्तीने कॅमेरे बंद केले. अर्णब गोस्वामी यांना धक्काबुक्की केली आणि घरातून फटफटत नेत पोलीस व्हॅनमध्ये बसवलं.


हा भारतीय लोकशाहीतील काळा दिवस आहे. भारतातील एका वृत्तवाहिनीच्या संपादकाला केसांना पकडून फरफट नेऊन अटक केली जाते. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पोलिसांनी कॅमेरे बंद केले आणि अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली. सासू-सासऱ्यांना औषधं देण्यासही पोलिसांनी अर्णब यांना रोखलं. शिवाय त्यांच्या मुलालाही धक्काबुक्की केली. सोबतच त्यांनी लेखी कायदेशीर नोट रेकॉर्डवर ठेवण्यास परवानगी नाकारली. कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांनी भारताच्या प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या संपादकाला ओढत नेलं, जसं की ते गुन्हेगार आहेत. अर्णब यांना आधी कोणतंही समन्स बजावलं नाही आणि कायदेशीर टीमला भेटूही दिलं नाही.

"मी काय करु शकतो हे तुला माहित नाही," असं पोलीस पथकाचे अधिकारी सचिन वझे अर्णब गोस्वामी यांना म्हणाले. मी सहकार्य करेन असं वारंवार सांगूनही कोणतीही प्रक्रिया न करता अर्णब गोस्वामी यांना क्राईम ब्रान्च युनिटकडे सोपवलं आणि त्यांना धक्काबुक्की केली.

सशस्त्र पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना धक्काबुक्की करुन पोलीस व्हॅनमध्ये ढकललं. अर्णब गोस्वामी म्हणाले की, "त्यांनी मला मारहाण केली. त्यांनी मला शारीरिक धक्काबुक्की केली. आमच्यासाठी लढा, असं मला भारताच्या लोकांना सांगायचं आहे. माझ्या मुलाला मारहाण केली."

मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार अधिकाराचा आणि वर्दीचा वापर करुन हल्ला करत आहे. हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय किंवा तथ्याशिवाय बंद झालेली केस पुन्हा ओपन करुन केवळ अर्णब गोस्वामी यांना वॉरंटशिवाय अटक करणं हे धक्कादायक आहे. भारत त्याविरोधात उभा राहणार आहे.

एन्काऊंटर कॉप आणि परमबीर सिंह यांचा उजवा हात असलेल्या सचिन वझे यांनी रिपब्लिक टीव्हीला सांगितलं की, "आयपीसीच्या कलम 306 अंतर्गत अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे." 2018 मधल्या एका आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी केली होती आणि कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करुन असं काहीही घडलं नसल्याचं सांगितलं.

सत्तचे गैरवापर करणाऱ्या, कायदा पायदळी तुडवणाऱ्या आणि माध्यमांची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांचा रिपब्लिक टीव्ही निषेध करते. फेक टीआरपी स्कॅमवरुन रिपब्लिक टीव्हीच्या न्यूजरुममध्ये पोहोचण्याची मुंबई पोलिसांची दुष्ट बाजू समोर आली. आता कोर्टाने बंद केलेल्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक धक्कादायक आहे.

आम्ही भारताच्या नागरिकांना, माननीय कोर्टाला आणि वरिष्ठ संस्थांना आवाहन करतो की, "त्यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रातील आणीबाणीविरोधात उभं राहिलं पाहिजे. या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन आम्ही करतो. रिपब्लिक मीडिया नेटवर्क शेवटपर्यंत लढत राहणार आहे आणि सत्याचा विजय होईल यात शंका नाही. सत्य कधीच पराभूत होत नाही."


गोस्वामींच्या अटकेचा एनबीएकडून निषेध
ज्या पद्धतीने अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे, त्याचा एनबीएने निषेध केला आहे. NBA नं निवेदनात म्हटलं आहे की, रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोस्वामी यांना आत्महत्येप्रकरणी 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. एनबीए गोस्वामींच्या पत्रकारितेच्या शैलीचं, पद्धतीचं समर्थन करत नाही. मात्र ज्या पद्धतीनं त्यांना अटक झाली ते अयोग्य आहे. मीडिया कायद्यापेक्षा मोठा नाही, परंतु अटक करताना योग्य प्रक्रिया होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही अपील करतो की गोस्वामींना योग्य पद्धतीनं वागणूक मिळावी. प्रामाणिकपणाने आणि सरकारच्या शक्तीचा दुरुपयोग होऊ नये, असं एनबीएनं म्हटलं आहे.