मुंबई : लोकल आणि ई पास याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सूचक विधान आज केले. इतर सर्वांनी जगभरात ज्या काही गोष्टी घाईगडबडीत केल्या असतील त्या गोष्टी महाराष्ट्र करणार नाही, आपण ज्या ज्या गोष्टी सुरु केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊन आपण या गोष्टी सुरु केल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत एखादी गोष्ट सुरू किंवा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र घेणार नाही, असे उध्दव ठाकरे म्हणाले. याचाच अर्थ मुंबई लोकल सुरू होण्यासाठी आणि ई पासची प्रक्रिया बंद होण्यासाठी आणखीन काही काळ वाट बघावी लागणार हे स्पष्ट झाले आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ठाण्यात दाखल झाले होते. ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका आणि कल्याण डोंबिवली महापलिकेची कोरोना संदर्भात आढावा बैठक त्यांनी घेतली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार संजय केळकर, आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक तसेच ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीचे आयुक्त, स्थानिक आमदार, खासदार, महापौर या बैठकीला उपस्थित होते.


Unlock 4 | 1 सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार


अधिकारी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि आसपासच्या शहरात कमी झालेल्या कोविड19 च्या रुग्णांबाबत अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक केले. ठाणे नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली परिसरात रुग्ण संख्या घाटत आहे. मात्र, असे असताना गाफील राहून चालणार नाही, हलगर्जीपणा करू नका असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. ठाणे शहरातील मुंब्रा प्रभाग समितीमध्ये covid-19 वर ज्या प्रकारे मात करण्यात आली त्याचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले. त्याबाबत विशेष माहिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. यासोबत पालिका स्तरावर कोणकोणत्या गोष्टी यानंतर देखील करण्याची आवश्यकता आहे त्याचे मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी केले. कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिकेत या पुढील काळात परिस्थिती नियंत्रणात येईल यासाठी काही नवीन उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.


यावेळी मुंबई ते ठाणे प्रवासात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्याकडे देखील मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. Covid-19 मुळे इतर कामांकडे दुर्लक्ष झाले असले तरी आता ती सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करा, रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्याचे काम लवकरात लवकर झाले पाहिजे असे आदेश त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.


1100 बेडच्या कोवीड केअर सेंटरचे ई लोकार्पण
आज आढावा बैठकी सोबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते म्हाडाने कळवा आणि मुंब्य्रात तयार केलेल्या 1100 बेडचे कोवीड केअर सेंटरचे ई लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे कळवा आणि मुंब्य्रासह आजूबाजूच्या परिसरातील नागरीकांना या रुग्णालयाचा फायदा होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता रुग्णांना बेड मिळणार नाही, अशी तक्रार देखील येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या रुग्णवाहीनीचे लोकार्पण यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले.


Aaditya Thackeray's letter to PM | परीक्षेच्या मुद्द्यावरून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र