मुंबई: ‘सामना’तील वादग्रस्त व्यंगचित्राबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर माफी मागितली आहे. पण या माफीनाम्यावर काँग्रेसचे माजी खासदास निलेश राणेंनी जोरदार टीका केली आहे.


या माफीला काही अर्थ नाही, जेव्हा घडले तेव्हा माफी मागितली नाही, राजकीय नुकसानाच्या भीतपोटी उद्धव ठाकरेंनी ही माफी मागितली आहे. असा हल्लाबोल निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

दरम्यान, यावेळी निलेश राणेंनी खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावरही शरसंधान साधलं. 'मानापमान हा विषय संजय राऊत यांचा नाही. समाजात त्यांची काहीही प्रतिमा नाही, उद्धव ठाकरे यांचे कान भरणं एवढंच राऊत यांचं काम.' अशी टीका राऊत यांच्यावर केली.

'संजय राऊतांमुळे सगळ्यांना घरी बसावं लागेल म्हणून उद्धव ठाकरेंनी माफी मागितली आहे.' असं म्हणत निलेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर जोरदार टीका केली.

दरम्यान, आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी व्यंगचित्राप्रकरणी माफी मागितली. “व्यंगचित्रामुळे भावना दुखावल्या असल्यास, शिवसेनेचा प्रमुख म्हणून महाराष्ट्रातील माझ्या माता-भगिनींची माफी मागतो.”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागितली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाईंनी काढलेल्या व्यंगचित्रावरुन राज्यातील राजकारण तापलं होतं. मराठा मोर्चांबद्दल वादग्रस्त ठरलेल्या व्यंगचित्रावरुन शिवसेनेवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी ‘सामना’तून दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, तरीही वाद कमी होण्याचा नाव घेत नव्हता. अखेर आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर माफी मागितली आहे.