आरक्षणामुळे महाविद्यालयीन अकरावी प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण होण्याची चिन्हं
एबीपी माझा वेब टीम | 07 Mar 2019 08:26 AM (IST)
मराठा आणि खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकल्यास यंदा महाविद्यालयातील प्रवेशाची वाट अधिकच बिकट होईल.
मुंबई : राज्य शिक्षण मंडळ एसएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर यंदा अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी मोठा गोंधळ उडणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. कारण या अकरावी प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला मिळालेलं 16 टक्के, खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मिळालेलं 10 टक्के आरक्षण, यामुळे यंदाच्या सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशात गोंधळ उडण्याची चिन्हं आहेत. एकूण आरक्षण 103 टक्के एससी, एसटी, एनटी, इ. : 52 टक्के मराठा : 16 टक्के खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल : 10 टक्के इनहाऊस : 20 टक्के व्यवस्थापन (मॅनेजमेंट) : 5 टक्के यामध्ये शाळांना संलग्नित असलेल्या कनिष्ठ महविद्यालयाला तसंच अल्पसंख्याक महाविद्यालय नसलेल्या महविद्यालयासमोर हा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया नेहमी कशी आणि कोणत्या निकषांवर राबवली जाणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. अल्पसंख्याक महाविद्यालयात अल्पसंख्याक 50 टक्के, व्यवस्थापन 5 टक्के आणि इनहाऊस 20 टक्के कोटा देण्यात आला आहे. तर संवैधानिक आरक्षण या महाविद्यालयात देण्यात येत नाही. यामुळे काही प्रमाणात अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळत आहे. मात्र बिगर अल्पसंख्याक महाविद्यालयं आणि शाळांना संलग्नित असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयासाठी खुल्या प्रवर्गाला प्रवेश कसा देणार हा प्रश्न आहे. मराठा आणि खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकल्यास यंदा महाविद्यालयातील प्रवेशाची वाट अधिकच बिकट होईल. त्यामुळे ऑनलाईन प्रवेशात बदलांसाठी वेळ द्यावा लागणार आहे. या प्रवेशासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठका सुरु असल्याची माहिती आहे.