मुंबई : देशभरात लोकसभा 2019 निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली. राष्ट्रवादीनेही निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी फक्त काँग्रेससोबत आघाडी करणार असून शिवसेनेला एकटंच लढावं लागेल, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.


मुंबईत प्रजासत्ताक दिनी विरोधकांनी संविधान बचाओ रॅलीचं आयोजन केलं आहे. यामध्ये शरद पवारांसह अनेक दिग्गज नेते सहभागी झाले आहेत.

'लोकसभा निवडणुका 2019 मध्ये आघाडी करण्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत दोनदा बोलणी झाली आहे. नुकतंच आम्ही विदर्भात एकत्रितपणे एका कार्यक्रमाचं आयोजनही केलं. जर आम्ही एकत्र लढलो, तर एक मजबूत पर्याय उपलब्ध होईल' असा विश्वास पवारांना वाटतो. 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

'शिवसेना जर शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहिली, तर त्यांच्यासाठी फायद्याचं ठरेल. त्यांच्याकडे समर्पित उमेदवार आहेत आणि युती असतानाही त्यांना भाजपकडून चांगली वागणूक मिळत नव्हती. स्वबळावर लढण्याच्या फैसल्यामुळे शिवसेनेला ताकद मिळेल.' असं शरद पवार म्हणतात.