मुंबई:  आज देशात नावे बदलण्याची नवीन पध्दत सुरु झाली आहे. आग्रा येथील ताजमहल जो हिंदूस्थानची इज्जत वाढवत आहे. त्याचे नाव बदलण्याची काय गरज आहे. त्यामुळे बेरोजगारी सुटणार आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.  देशातील समस्यांकडे दुर्लक्ष करुन त्याकडील लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे. देशासमोर बेरोजगारी,गरीबी अशा समस्या असताना नाव बदलण्याची गरज नाही. सत्ताधारी लोकांना चुकीच्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. जाती-जातींमध्ये, धर्मा-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे आणि गावागावात चुकीचे संदेश पोचवण्याचे काम केले जात असल्यामुळे देशात आज खराब आणि भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या शक्तींच्याविरोधात सामना करण्यासाठी तयार होतानाच आपल्याला नेहरु,मौलाना आजाद,आंबेडकरांचे विचार घेवून आपण पुढे जायला हवे असे आवाहन देखील शरद पवार यांनी केले. मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शरद पवार बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये आजच्या देशातील सद्दय परिस्थितीवर भाष्य करतानाच याविरोधात देशातील जनतेने एकत्र येण्याचे आवाहन केले. देशातील मुस्लिम समाज आज भेटल्यानंतर मस्जिदचा विषय काढून नका सांगत आहेत. सत्ताधारी अयोध्येमध्ये राममंदीर बनवायला निघाले आहे. परंतु आम्ही मंदीराच्याविरोधात नाही आमचा कोर्टावर विश्वास असून कोर्ट जो निर्णय देईल तो निर्णय आम्ही मान्य करु असे मुस्लिम समाज सांगत आहेत असेही शरद पवार म्हणाले. मौलाना आजाद यांच्या दुरदृष्टीच्या कार्यावर प्रकाशझोत शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये देशाचे शिक्षणमंत्री राहिलेले मौलाना आजाद यांच्या दुरदृष्टीच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. आजाद यांच्यामुळे कला,साहित्य आणि सांस्कृतिक याच्यासह सर्वच क्षेत्रामध्ये नॅशनल इन्स्टियूट उभी करण्याचे काम झाले आणि त्यामुळे आज आपण इथपर्यंत पोचल्याचेही त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर आलेला अनुभव आणि त्याठिकाणी मौलाना आजाद यांच्याबद्दल असलेला आदर याचे किस्से सांगितले. शिवाय त्यांनी आपल्या भाषणामध्ये लातूरमध्ये झालेला भूकंप आणि खडकपूर येथील तज्ज्ञांनी लातूरमध्ये उभारलेली घरे ही आजही टिकली आहेत ही देण आजाद यांची असल्याचेही पवार यांनी सांगितले.