मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील लोकल अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला. मुंबईत एकाच दिवशी झालेल्या विविध लोकल अपघातात 12 जणांना प्राण गमवावे लागले, तर 5 जण जखमी झाले आहेत. लोहमार्ग पोलिसांनी काढलेल्या रिपोर्ट कार्डमध्ये ही आकडेवारी समोर आली आहे.


सर्वात जास्त बळी कल्याण आणि ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या क्षेत्रात झाले आहेत. कल्याण आणि ठाण्यात प्रत्येकी तीन प्रवासी मृत्युमुखी पडले. डोंबिवली, कुर्ला, वडाळा, वांद्रे, मुंबई सेंट्रलमध्येही एकूण दहा प्रवाशांचा मृत्यू झाला. सहा प्रवाशांची ओळख पटलेली नाही.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी लोकलमध्ये गर्दी जास्त असते. मात्र लोकलखाली किंवा लोकलच्या धडकेत मृत्युमुखी पडण्याला काही प्रमाणात प्रवासीही जबाबदार आहेत. सर्वाधिक मृत्यू हे रेल्वेरुळ ओलांडताना आणि धावती लोकल पकडताना झाले आहेत.

मुंबई लोकल दरवर्षी तीन हजार पेक्षा जास्त प्रवाशांचे बळी घेते. गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीतून हे स्पष्ट होतं.

2017
एकूण मृत्यू - 3014
रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू- 1651
धावत्या ट्रेनमधून पडल्याने मृत्यू - 654
लोकलच्या धडकेत मृत्यू - 12
रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील पोकळीत अडकून मृत्यू - 18

2016
एकूण मृत्यू - 3202
रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू - 1798
धावत्या ट्रेनमधून पडल्याने मृत्यू - 657
लोकलच्या धडकेत मृत्यू - 8
रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील पोकळीत अडकून मृत्यू - 13

2015
एकूण मृत्यू -  3304
रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू - 1801
धावत्या ट्रेनमधून पडल्याने मृत्यू - 806
लोकलच्या धडकेत मृत्यू - 13
रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील पोकळीत अडकून मृत्यू -40