नवी मुंबई : नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांच्या मनातील खदखद वाढली आहे. सुतार राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. ऐरोलीचे राष्ट्रवादी आमदार संदीप नाईक आणि अनंत सुतार यांच्यात बिनसल्याची चर्चा आहे.


बोर्डाच्या धर्तीवर दहावी सराव परीक्षेचे आयोजन अनंत सुतार यांच्याकडून गेल्या 20 वर्षांपासून करण्यात येत होते. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी हा उपक्रम सुरु ठेवला होता. या सराव परीक्षेचे बॅनर संपूर्ण शहरात लावण्यात आले असून यात अनंत सुतार यांचा फोटो गायब झाला आहे.

अनंत सुतार राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष असूनही त्यांचा फोटो वगळल्याने आश्चर्य होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना अनंत सुतार यांनी राष्ट्रवादी आमदार संदीप नाईक यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

'1996 पासून दहावी सराव परीक्षांचा उपक्रम मी घेत आलो असून माझ्या प्रॉडक्शनवर नव्याने लेबल लावलं गेलं आहे. मात्र फोटो न लावण्याचा हा पहिला अनुभव नाही' असंही सुतार यांनी सांगितलं.

दरम्यान, ‌नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या वतीने लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांचे श्रेय एसएससी सराव परीक्षेसाठी असून सुतार हे या उपक्रमाचे मुख्य प्रबंधक आहेत. सर्वांच्या सहकार्याने हा शैक्षणिक उपक्रम आम्ही केवळ पुढे नेत आहोत, असं आमदार संदीप नाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

सराव परीक्षेवरुन सुतार नाराज असल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांवर आल्या. त्यावर खुलासा करताना आमदार नाईक म्हणाले की सराव परीक्षेचा उपक्रम सुतार यांनीच सुरु केला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो केवळ राबवत आहोत. या उपक्रमातून नवी मुंबईतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, हेच आमच्या सर्वांचं उद्दिष्ट आहे, असंही आमदार नाईक यांनी सांगितलं.