मुंबई : मागील बारा दिवसांपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आझाद मैदानात उपोषण करत आहेत. आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चालढकल करत असल्याचा आरोप अजित पवारांनी यावेळी केला.


सरकारने मराठा आरक्षणाबाबत केवळ घोषणा केली मात्र प्रत्यक्ष कृती केली नाही. गेली चार वर्ष सरकार आंदोलनकर्त्यांना खेळवत आहे. गेल्या दोन आठवड्यापासून याठिकाणी आंदोलन सुरू आहे. मात्र याठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अधिवेशनात आम्ही पहिल्याच दिवशी आक्रमक होऊ, असा इशाराही अजित पवार यांनी सरकारला दिला.


मुख्यमंत्री आणि इतर मंत्री मुंबईत असतात ते चर्चा करू शकले असते. मात्र हे सरकार असताना या कार्यकर्त्यांनी काळी दिवाळी साजरी केली. याबाबत आम्ही सरकारचा निषेध करतो. कोणतच सरकार 100% मागणी पूर्ण करू शकत नाही, पण काही मागण्या पूर्ण करू शकतो. आज सुभाष देशमुख उपोषणकर्त्यांच्या भेटीला आले, आम्ही येणार म्हणून मंत्री आले का? हे कळलं नाही, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.


निवडणूक जवळ आल्यामुळे राम मंदिराचा मुद्दा पुढे आला आहे. चार वर्षात सरकारला राम आठवला नाही, रामाला वनवासात पाठवलं. जनतेने या सरकारचा खरा चेहरा ओळखला पाहिजे. राजकीय इच्छाशक्ती असली की सरदार पटेल पुतळा उभारला जातो, असं अजित पवार म्हणाले.


पिढ्यानपिढ्या शहरांची नाव आहेत. काही घटकांना वाटलं तरी तिथे भावनेचा प्रश्न वाटतो. बेरोजगारीचा प्रश्न आज महत्वाचा आहे. महाराष्ट्र पिछाडीवर आलं आहे. त्यामुळे सरकारने राज्याच्या विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे. राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप अजित पवारांनी केला.