परभणी : आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीत मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप असतो हे परभणीतील प्रकाराने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर हे सेवानिवृत्त झाले त्यांच्या जागी आयएएस आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र पदभार घ्यायच्या दिवशीच त्या परतल्यानं चर्चेला ऊत आला आहे. स्थानिक खासदारांनी ही बदली करवून घेतल्याची चर्चा परभणीत दबक्या आवाजात होत आहे. आमचे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी खासदार संजय जाधव यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल प्रकरणाबाबत काहीही बोलण्यास नकार दिला,  या बदली प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला.  या प्रकरणी आता पालकमंत्री नबाव मलिक यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. 


परभणीत राजकीय दबावातून नूतन जिल्हाधिकारी पदभार न घेताच परतल्या!


नवाब मलिक म्हणाले की, जिल्हाधिकारी कोण असावा हे मी ठरवत नाही, आंचल गोयल या मला बोलूनच परभणीमध्ये गेल्या होत्या. पण त्यांना का रुजू होऊ दिलं नाही याबद्दल मला माहिती नाही. आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितून होतात. जीएडी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे. काही अज्ञानी आणि लोक माझ्यावर आरोप करत आहेत ते चुकीचे आहेत, असं नवाब मलिक म्हणाले. 


ते म्हणाले की, गोंदियाचा पालकमंत्री असताना नयना गुंडे नावाच्या महिला अधिकारी होत्या. माझ्या दोन्ही खात्यामध्ये महिला सचिव आहेत. त्यामुळे महिलांना काम करू दिलं जात नाही हा आरोप चुकीचा आहे. काल मुख्य सचिवांशी या विषयावर मी बोललो ते त्याबद्दल खुलासा करतील, असं ते म्हणाले. 


 जिल्हाधिकारी कोण असावा हे मी ठरवत नाही, आंचल गोयल या मला बोलूनच परभणी मध्ये गेल्या होत्या. पण त्यांना का रुजू होऊ दिलं नाही याबद्दल मला माहिती नाही. मीच त्यांना परभणी मध्ये जाण्यासाठी सांगितलं होतं, पण शेवटच्या दिवशी काय झालं याची मला कल्पना नाही. यासंदर्भात जीएडीचे लोक तुम्हाला उत्तर देऊ शकतील. महिला अधिकाऱ्यांच्या बाबतीत असं झालं, तसं झालं बोलणे योग्य नाही हा विषय माझ्या अखत्यारित नाही. जे काही निर्णय आहेत ते मुख्यमंत्री घेत आहेत, असं मलिक म्हणाले. 


जागरूक नागरिक आघाडीच्या वतीने आंदोलन


आंचल गोयल यांनी पदभार घेण्याच्या दिवशीच स्थानिक राजकारण्यांनी मुंबईत बसून त्यांची नियुक्ती रद्द करून अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार देण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर असल्याने परभणीतील नागरिकांनी जागरूक नागरिक आघाडीच्या वतीने या विरोधात आंदोलन छेडले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने परभणीत एकवटले असून पुन्हा आंचल गोयल यांना नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.


नेमकं काय आहे प्रकरण 


परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर हे सेवानिवृत्त झाले त्यांच्या जागी आयएएस आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली होती. 31  जुलै रोजी त्यांना पदभार घेण्याच्या सूचना होत्या मात्र जिल्ह्यातील काही नेत्यांच्या दबावातून त्यांना पदभार न देता चक्क अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे पदभार देण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव अजित पाटील यांनी काढले होते. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील नेत्यांना आयएएस अधिकारी नकोय का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  परभणीचे मावळते जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर हे पूर्वी साई संस्थानचे सीईओ होते. त्यांना दीड वर्षापूर्वी परभणी जिल्हाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला.  ते सेवानिवृत्त झाले ते निवृत्त होण्याआधी 13 जुलै रोजी राज्यातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या ज्यात परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय त्यांना 31  जुलै रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडून पदभार घेण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे त्या मागच्या 3 दिवसांपासून परभणीत दाखल झाल्या होत्या, परंतु जिल्ह्यातील काही नेत्यांनी मुंबईत बसून त्यांनी इथे रुजू न होता आपल्या मर्जीतील अधिकारी रुजू व्हावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यश आले असल्याचं बोललं जात आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव अजित पाटील यांनी पुन्हा एक आदेश काढून जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना आंचल गोयल यांना पदभार न देता अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे पदभार सोपविण्याचे सांगण्यात आले त्यामुळे आंचल गोयल यांना परभणीतून परतावे लागले.


कोण आहेत आंचल गोयल 


आंचल गोयल या 2014 च्या बॅचच्या आयएएस आहेत.  2014 ते 2018 पालघर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 


2018 पालघर येथून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती.


2019 ला पालघर येथून महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक.


13 जुलै 2021 ला पहिल्यांदाच परभणी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती


अतिशय शिस्तप्रिय आणि प्रशासनावर पकड ठेवून काम करणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख.