नवी मुंबई : उन्हाळा सुरु होताच सर्वांना वेध लागतात ते आंब्याचे. मात्र हे रसाळ फळ खाताना थोडीशी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. एपीएमसी मार्केटमध्ये चुकीच्या पद्धतीने आंबे पिकवले जात असल्याचं समोर आलं आहे.


नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्यावर केमिकलची फवारणी करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याच व्हिडिओमुळे आता अन्न आणि औषध प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद रंगला आहे.

व्हिडिओमध्ये सुरु असलेल्या फवारणीमध्ये इथरेल हे रसायन वापरलं असून त्याला कृषी विभागाची परवानगी असल्याचा दावा व्यापारी करत आहेत. मात्र या औषधाच्या प्रमाणावरुन अन्न आणि औषध विभागाने हरकत घेतली आहे. अनेक व्यापाऱ्यांनी 'एपेडा'ने दिलेल्या नियमावलीनुसार रायपनिंग चेंबरमध्ये आंबा पिकवला जात असल्याचा दावा केला आहे.

दिवसभर नवी मुंबईत एपीएमसीमध्ये आंबे व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. त्यामुळे तुम्ही विकत घेतलेल्या आंब्यावर रसायनाचा अतिरिक्त वापर तर होत नाही ना, याची खात्री नक्की करा!