नवी मुंबई : मुंबई आणि उपनगरी परिसरात मोठा रेल्वे अपघात घडवण्याचं षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, नवी मुंबईत गव्हाणफाटा जवळ रेल्वे ट्रॅकजवळ विजेचा खांब ठेवल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मोठा घातपात घडवण्याचा कट शिजत असल्याची भीती वर्तवली जात आहे.


आठवड्यात दुसऱ्यांदा अशाप्रकारे रेल्वे ट्रॅकवर संशयास्पद वस्तू आढळली आहे. मंगळवारी नवी मुंबईतील कळंबोली भागात रेल्वे रुळांवर लोखंडी रॉड ठेवल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर बुधवारी पनवेलपासून जवळ असलेल्या गव्हाणफाटा येथे रेल्वे ट्रॅकवर विजेचा खांब ठेवण्यात आला.

हा रेल्वेमार्ग जेएनपीटीकडे जाणारा आहे. जेएनपीटी बंदरात येणारा माल हा मालगाड्यांच्या माध्यमातून आणला जातो. त्यासाठी या रेल्वेमार्गाचा वापर होतो. या प्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आतापर्यंत दोन वेळा संबंधित रेल्वेगाड्यांच्या मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठे अपघात टळले आहेत.

दिवा-पनवेल मार्गावर मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला!


दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर मोटारमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुणे-सांतरागाछी एक्स्प्रेसला होणारा भीषण अपघात टळला आणि एक्सप्रेसमधील हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. नेवडे फाटा परिसरात रेल्वेमार्गावरील दोन रूळांमध्ये लांब लोखंडी तुकडा आढळून आला. ही घटना सोमवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास उघडकीस आली.

दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरून 02821 ही पुणे-सांतरागाछी एक्स्प्रेस सोमवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास जात होती. ही एक्स्प्रेस नेवडे फाटा परिसरात आली असता एक्स्प्रेसचे मोटरमन पाटील यांना गाडीखाली जड वस्तू अडकल्याचे आढळून आले. मोठ्याने आवाज येऊ लागल्यामुळे पाटील यांनी तातडीने गाडी थांबवली आणि गाडीखाली उतरून पाहिले असता दोन रेल्वे रुळांच्या मध्ये लांबलचक लोखंडी रुळाचा तुकडा पडल्याचे आढळून आले. इंजिनच्या पुढील बाजूस तो तुकडा अडकल्यामुळे आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

उभ्या रेल्वे ट्रॅकवर आडवा ट्रॅक, मुंबईत जनशताब्दी पाडण्याचा प्रयत्न?


काही दिवसांपूर्वी जनशताब्दी एक्सप्रेसच्या मार्गावरही अशाप्रकारे लोखंडी तुकडा टाकलेला आढळून आला होता. मात्र, मोटरमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अपघात टळला होता. ही घटना अजून ताजी असतानाच पुन्हा असा प्रकार उघडकीस आल्यामुळे रेल्वे मार्गांच्या आणि त्यावरून धावणाऱ्या गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रेल्वे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर?


गेल्या महिन्यात ओडिशाच्या सीमेजवळ असलेल्या आंध्र प्रदेशमधील कुनेरु स्टेशनजवळ जगदलपूर-भुवनेश्वर एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरुन घसरले होते. या रेल्वे अपघातात 39 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता.

कानपूरमध्येही नोव्हेंबरमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेमागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंदूर-पटना एक्स्प्रेसचा 20 नोव्हेंबर 2016 रोजी कानपूरच्या पुखराया स्टेशनजवळ भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये 150 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या :

हिराखंड एक्स्प्रेसचे 8 डबे घसरुन 39 प्रवाशांचा मृत्यू


पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे 14 डबे घसरले, 63 प्रवाशांचा मृत्यू


‘डबे घसरले नि डोळ्यादेखत त्या चिमुरडीच्या शरीराचे दोन तुकडे’


जखमेवर मीठ, कानपूर ट्रेन दुर्घटनेतील जखमींना जुन्या नोटा वाटप