मुंबई : नरेश पाटील मुंबई उच्च न्यायालयाचे 42 वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून 25 ऑक्टोबरपासून पदभार सांभाळणार आहेत. नरेश पाटील हे 13 ऑगस्ट 2018 पासून मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून कामकाज पाहात होते. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारच्या कायदे मंत्रालयाकडे कोलेजियमनं नरेश पाटील यांच्या नावाची शिफारस केली होती.


नरेश पाटील यांनी 1979 मध्ये मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली होती. त्यानंतर फौजदारी, दिवाणी अशा अनेक प्रकारच्या खटल्यात वकिली केली. त्यानंतर पुढे त्यांनी एएसजी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात भारत सरकारची बाजू मांडण्याचंही काम केलं. त्यानंतर साल 2001 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून निवड करण्यात आली.


डॉ. मंजुला चेल्लूर 5 डिसेंबर 2017 रोजी निवृत्त झाल्यापासून मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्तींचं पद रिक्त होतं. या जागी त्यानंतर डॉ. विजया कापसे-तहिलरमानी यांची प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून वर्णी लागली होती.


मात्र डॉ. विजया कापसे-तहिलरमानी यांची 13 ऑगस्ट 2018 रोजी त्यांना मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर बढती देण्यात आली. तेव्हापासून सेवा ज्येष्ठतेनुसार नरेश पाटील यांच्याकडेच प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून मुंबई उच्च न्यायालयाची धुरा सोपवण्यात आली होती.