कल्याण : दोन गटात झालेल्या हाणामारीत तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडलाय. पार्किंगच्या वादातून ही हाणामारी झाल्याचं सांगितलं जातं आहे. रियाज शेख असं यातल्या मृत तरुणाचं नाव असून तो रिक्षाचालक होता.


रियाज शेख राहत असलेल्या नेतिवलीच्या श्रीकृष्णनगर भागात एक हुक्का पार्लर सुरू होतं, या पार्लरच्या बाहेर मोठया प्रमाणात गाड्यांची पार्किंग होत असल्याने रियाजने याला आक्षेप घेतला होता, यावरूनच काल रियाज आणि तिथल्या वाहनचालकांमध्ये वाद झाला.

रियाज टिळकनगर पोलीस ठाण्यात गेला, मात्र पोलिसांनी योग्य दखल घेतली नसल्याचा त्याच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. यानंतर आज पुन्हा एकदा या भागात रियाजला काही जणांनी मारहाण केली आणि गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच रियाजची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.