भिवंडी : भिवंडीतील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील एका चाळीत विवाहितेची एकतर्फी प्रेमातून भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चिंतादेवी रमेश यादव ( 23 ) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. नारपोली पोलिसांनी या हत्येची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या काही तासात आरोपी निखिल कडू याला बेड्या ठोकल्या.


राहनाळ येथील हनुमान मंदिरा शेजारील चाळीत रमेश यादव पत्नी चिंतादेवी व सहा महिन्याच्या मुलासह राहच होता. रमेश नेहमी प्रमाणे कामावर गेला असता दुपारच्या सुमारास चिंतादेवी हिची तीक्ष्ण हत्याराने भोसकून आणि त्यानंतर डोक्यावर घाव घालून तिची हत्या करण्यात आली. रमेश घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. रमेश यादवने तात्काळ शेजारी राहणाऱ्यांना बोलावले. नारपोली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.


पोलिसांनी हत्येचा तपास सुरु केल्यानंतर चाळ मालकाचा मुलगा निखिल कडू याचं नाव समोर आलं. चिंतादेवीवर तो एकतर्फी प्रेम करत असल्याची माहिती समजताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस चौकशी दरम्यान त्याने हत्येची कबुली दिली.


निखिल कडू महिलेच्या घरात चाकू घेऊन घुसला आणि तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करु लागला. मात्र चिंतादेवी ओरडू लागल्याने बिथरलेल्या निखिल कडूने तिच्या पोटात चाकू खुपसून तिला जायबंदी केलं. ती बेशुद्ध पडताच त्याने तेथून पळ काढला. परंतु चिंतादेवीचा मृत्यू झाला की नाही याची खात्री तो तासाभराने परत आला. श्वास सुरु असल्याने घरातील हातोडा घेऊन त्याने चिंतादेवीच्या डोक्यात प्रहार करुन तिची हत्या केली.


व्यसनाच्या आहारी गेल्याने मागील तीन महिन्यांपासून निखील व्यसनमुक्ती केंद्रात राहून जून महिन्यात घरी परतला होता. चिंतादेवी हिच्यावर त्याची वाईट नजर होती आणि तो संधीची वाट पाहत होता.