मुंबई : मुंबई विद्यापीठातल्या निकालाचा घोळ आणखी वाढला आहे, कारण मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेल्या 4 बैठकांपैकी 3 बैठका रद्द झाल्या आहेत. सिनेटची परवानगी न मिळाल्यानं या बैठका रद्द झाल्या आहे.


आज रविवार असला तरीही मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी अकॅडमीक काऊन्सिल, मॅनेजमेंट काऊन्सिल, प्रॉस्पेक्टिव्ह प्लान आणि सिनेटची बैठक बोलवली होती. त्यापैकी मॅनेजमेंट काऊन्सिल, सिनेट आणि अकॅडमीक काऊन्सिलची कोरम अभावी बैठक रद्द झाली आहे.

दरम्यान मुंबई विद्यापीठाचे निकाल लागण्याची डेडलाईन संपायला आता काही तास उरले आहेत, मात्र शिक्षणमंत्र्याच्या आश्वासनानुसार उद्या निकाल लागतील असं चित्र दिसत नाही. विद्यापीठाच्या 3 लाख उत्तरपत्रिका तपासणं अद्याप बाकी आहे. यामुळं शिक्षणमंत्री विनोद तावडेंची धावपळ सुरू झाली आहे. काल शनिवारी  विनोद तावडेंनी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेऊन मुंबई विद्यापीठाच्या निकालासंदर्भात सविस्तर चर्चा केली.

दुसरीकडे विनोद तावडेंविरोधात आता शिवसेना मैदानात उतरली आहे. उद्यापर्यंत निकाल न लागल्यास तावडेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडू असा इशारा शिवसेना आमदार अनिल परबांनी दिला आहे.

दरम्यान 31 जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठीच्या सर्व विभागाचे निकाल लागणं अशक्य असल्याचं विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं आहे. त्यामुळं तावडेंची अडचण चांगलीच वाढली आहे.