Amit Thackeray on Mumbai University Election : 22  सप्टेंबर 2024 रोजी मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) पदवीधर सिनेट निवडणुका पार पडणार होत्या. मात्र, विद्यापीठाने पुन्हा एकदा मागील वेळेसारखंच रात्रीच एक परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचे जाहीर केलं आहे. ही काही पहिली वेळ नाही. मागील निवडणुका जाहीर झाल्यानंतरही रात्रीच्या वेळीच राजकीय दबावाला बळी पडून परिपत्रक काढले गेले होते. आता दुसऱ्यांदा अशाच प्रकारे सिनेट पदवीधर निवडणुकांसंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे. प्रत्येक वेळी रात्रीच परिपत्रक निघते, त्यामुळं मुंबई विद्यापीठाचा कारभार रात्रीस खेळ चाले या मालिकेसारखा चालू आहे की काय? असा प्रश्न सर्वांना पडला असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. याबाबत अमित ठाकरे ( Amit Thackeray ) यांनी ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. 


मुळात कोणतीही निवडणूक, मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेची असो, विधानसभेची असो, लोकसभेची असो, अथवा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका असो, या सहकारी व पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीवर आणि परीश्रमांवर लढवल्या जातात. त्यासाठी राजकीय संघटनांचे, विद्यार्थी संघटनांचे अनेक सहकारी व पदाधिकारी दिवस-रात्र परिश्रम करत असतात. परंतू, मुंबई विद्यापीठाने जर सिनेट पदवीधर निवडणुका जाहीर करुन रद्द करण्याचेच धोरण अवलंबले असेल, तर याचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जाहीर निषेध करते. निवडून आलेले सिनेट सदस्य हे विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देतात. त्यामुळेच या निवडणुकांचे गांभीर्य विद्यापीठाला लवकरात लवकर समजले तर बरे होईल असे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. 


मुंबई विद्यापीठ हे राजकीय दबावाला बळी पडतेय


मागील वेळीसुद्धा जेव्हा विद्यापीठाने निवडणुका रद्द केल्या होत्या, तेव्हा मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या बाबतीत मुंबई विद्यापीठाच्या अनाकलनीय कारभाराचा जाहीर निषेध केला होता. मुंबई विद्यापीठ हे राजकीय दबावाला बळी पडत असून, एक स्वतंत्र यंत्रणा म्हणून त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. परंतु, त्यांची ही भूमिका संशयास्पद असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. म्हणूनच यावेळी जेव्हा मुंबई विद्यापीठाने पुन्हा निवडणुका जाहीर केल्या, त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या निवडणुकांचा सखोल अभ्यास केला आणि निवडणुका कायद्याला धरून नसल्याचे लक्षात आल्याने, त्या पुन्हा पुढे ढकलल्या जातील अशी शक्यता आधीच व्यक्त केली होती.


विद्यापीठ प्रशासनाने निवडणुकीचा चालवलेला हा खेळ बंद करावा


माझे सहकारी निवडणूक लढवण्याच्या बाजूने होते. त्यांचा सन्मान राखत, त्यांना विद्यापीठाचा भविष्यातील भोंगळ कारभार समजावून सांगितला आणि त्यांनाही परिस्थितीची जाणीव झाली. त्यामुळेच माझ्या सहकारी आणि पदाधिकाऱ्यांचे परीश्रम वाया जाऊ नयेत, म्हणून आम्ही 22 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या सिनेट पदवीधर निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला. आज मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत, हे पाहून आम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई विद्यापीठ प्रशासनाला लवकरच निवडणुकीचा चालवलेला हा खेळ बंद करण्याची सद्बुद्धी येवो, ही अपेक्षा व्यक्त करतो असेअमित ठाकरे म्हणाले.