मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर आता तुम्हाला एकही भिकारी दिसणार नाही कारण मुंबई पोलीस आता मुंबईमधील भिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. मुंबई पोलिसांकडून "भिक्षेकरी पकड मोहीम" राबविण्यात येणार आहे. ज्या अंतर्गत रस्त्यांवरील भिकऱ्यांना पकडून त्यांना चेंबुर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्र येथे ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांनची कोविड चाचणी सुद्धा करण्यात येणार आहे.


नेमकी काय आहे मोहिम?


भिक्षेकरी पकड मोहीम अंतर्गत मुंबईच्या रस्त्यांवरील भीक मागणाऱ्या लोकांना मुंबई पोलीस ताब्यात घेणार आहे. फेब्रुवारी पासून या मोहिमेला सुरवात करण्याचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आदेश दिले आहेत. त्यांची कोविड चाचणी करून त्यांची रवानगी चेंबूर येथील भिक्षेकरी स्वीकार गृहामध्ये करण्यात येईल.


भीक मागणं हा कायद्याने गुन्हा आहे


भीक मागणं हा कायद्याने गुन्हा असून याचे पालन मुंबई पोलीस आता काटेकोरपणे करणार आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये दिवसेंदिवस भिक्षेकरांची संख्या वाढत आहे आणि यामध्ये या वाईट परिस्थितीला आपला व्यवसाय बनवणार यांची संख्या जास्त आहे. ज्यामुळे पोलिसांनी या मोहिमेला सुरुवात केली आहे.


मुंबईतील आज पहिली कारवाई आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या पथकाकडून करण्यात आली. आझाद मैदान पथकाने त्यांच्या हद्दीतील 14 भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची कोविड चाचणी करून त्यांना चेंबूर येथील "भिक्षेकरी स्वीकार गृह"मध्ये करण्यात आली.


का ही कारवाई?


भीक मागण्यासाठी विशेष करून लहान मुलांचा वापर केला जातो. काही वेळेला ही मुलं चोरून यांना भीक मगायला प्रवृत्त केलं जातं होते. तर लोकांची सहानुभूती मिळवूण जास्त पैसे मिळावे म्हणून नुकतच जन्मलेल्या बाळाला ही लोकं उपाशी ठेवतात, ते बाळ सतत रडत राहावं म्हणून त्याला नाहक त्रास देतात. ज्यामुळे त्या बाळाची पिळवणूक होत असते. तर काही लोकांसाठी भीक मागणे हा व्यवसाय बनला आहे. दिव्यांग असल्याचं नाटक करून किंवा एखादा गंभीर आजार असल्याचं खोट सांगून लोकांन कडून पैसे घेतले जातात. पैसे कमवण्यासाठीचा हा सर्वात सोयीस्कर मार्ग काहींसाठी झाला आहे ज्याला रोखणे गरजेचं आहे.


भीक मागणे ही इतकी वाईट अवस्था आहे की आपल्या शत्रूवरही अशी वेळ येऊ नये असं म्हटलं जातं. पण मात्र याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. ज्याला आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. आदेश आल्याबरोबर पोलिसांनी युद्ध पातळीवर या कारवाई सुरू केली आहे. तसेच येणाऱ्या दिवसात सुद्धा अशाच प्रकारे धडक कारवाया मुंबई पोलिसांकडून सुरू ठेवण्यात येणार असल्याचं सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या कडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात मुंबईच्या रस्त्यावर तुम्हाला एक ही भिकारी दिसला नाही तर आश्चर्य वाटू देऊ नका.