मुंबई : दहावी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी मुंब्रातील ‘किडीज पॅराडाईज’ शाळेच्या मुख्याध्यापिका झाकिया शेख आणि तिचा पती फिरोज खान यांची चौकशी सुरु आहे. आंबोली पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी दया नायक यांनी या प्रकरणी दोघांना समन्स बजावला आहे.


शाळेच्या कामकाजात अनेक अनियमितता आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, फिरोज खान हा शाळा व्यवस्थापनाचा सदस्य नव्हता. त्याच्याकडे आवश्यक नियुक्त पत्र किंवा इतर वैध कागदपत्रही नव्हते. तरीही प्रश्नपत्रिकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत त्याची मजल होती.

मुंब्रातील या शाळेत यंदा 302 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. बोर्डाच्या नियमानुसार, केवळ शाळेचे कर्मचारीच पर्यवेक्षक म्हणून काम पाहू शकतात.

फिरोज खानने पाच पेपर लीक केले, असं पोलिसांनी सांगितलं. तर सकाळी नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान आपल्याला पेपर मिळाल्याचं खानने पोलिसांसमोर कबूल केलं. मात्र 19 मार्चला पेपर फुटीचं प्रकरण उजेडात आलं.

"सकाळी नऊच्या सुमारास पेपर येतात. ते माझ्याच टेबलावर असतात आणि त्यांना हात लावण्याची परवानगी कोणालाही नसते. दहा वाजता पेपरचा गठ्ठा खोलत असत. फिरोज खानला बाहेरुन पेपर मिळाले असावेत. त्याच्या हेराफेरीबाबत मला कोणतीही कल्पना नव्हती आणि मला यामुळे धक्का बसला आहे. याबाबत मला माहित असतं, तर आधीच तक्रार केली असती," असं झाकिया शेख यांनी सांगितलं.

तर मी पेपर लीक करत असल्याबाबत मुख्याध्यापकांना कल्पना नव्हती, असं फिरोज शेखने म्हणाला. तसंच खान औरंगाबादमधील सात जणांना पेपर पाठवत असल्याचं पोलिस तपास समोर आलं आहे.

विद्यार्थ्यांची बालसुधारगृहात रवानगी
एसएससी परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी आठ विद्यार्थ्यांना शुक्रवारी अटक करुन त्यांना डोंगरीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. एसएससी विद्यार्थ्यांविरोधात अशी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

समिती तपास करणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाने एसएससी पेपर फुटीच्या रॅकेटचा तपास करण्यासाठी एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. दोषी ठरलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना तीन ते पाच वर्षांपर्यंत एसएससीची परीक्षा देण्यास बंदी घालण्यात येणार आहे.