गोऱ्हेंसोबतच्या खडाजंगीच्या वृत्तावर बारणेंचं स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम | 19 Sep 2017 02:32 PM (IST)
पक्षहिताला बाधा येण्याच्या उद्देशाने या बातम्या पेरण्याचे काम केलं, असा दावा खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.
मुंबई : 'मातोश्री'वर शिवसेना नेते, आमदार-खासदारांच्या बैठकीदरम्यान खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार नीलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचं वृत्त होतं. मात्र आपल्यातील अंतर्गत संवादाला वादाचं रुप देऊन विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण श्रीरंग बारणेंनी दिलं आहे. पक्षपातळीवरील कामकाजाचा आढावा, पक्षप्रमुखांनी घेतला. पक्षहिताच्या दृष्टीने नेत्यांनी आपली मतं मांडली. तसंच सर्व आमदार, खासदारांना मतं मांडण्याची संधी देण्यात आली. कोणताही शाब्दिक वाद, बाचाबाची झालेली नाही. पक्षपातळीवरील अंतर्गत संवादाला वादाचं स्वरुप देण्यात आलं. नेत्यांमधील चर्चेच्या वास्तवाचा प्रसिद्धी माध्यमांनी विपर्यास करुन रंगवलं. पक्षहिताला बाधा येण्याच्या उद्देशाने या बातम्या पेरण्याचे काम केलं, असा दावा बारणेंनी केला आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक झाली होती. या बैठकीत आमदार नीलम गोऱ्हे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचं वृत्त होतं. मात्र शिवसेनेच्या धोरणाची आखणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मंत्री, खासदार, आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांची बैठक आयोजित केली होती, असं बारणेंनी सांगितलं.