मुंबई : 'मातोश्री'वर शिवसेना नेते, आमदार-खासदारांच्या बैठकीदरम्यान खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार नीलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचं वृत्त होतं. मात्र आपल्यातील अंतर्गत संवादाला वादाचं रुप देऊन विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण श्रीरंग बारणेंनी दिलं आहे.


पक्षपातळीवरील कामकाजाचा आढावा, पक्षप्रमुखांनी घेतला. पक्षहिताच्या दृष्टीने नेत्यांनी आपली मतं मांडली. तसंच सर्व आमदार, खासदारांना मतं मांडण्याची संधी देण्यात आली. कोणताही शाब्दिक वाद, बाचाबाची झालेली नाही. पक्षपातळीवरील अंतर्गत संवादाला वादाचं स्वरुप देण्यात आलं. नेत्यांमधील चर्चेच्या वास्तवाचा प्रसिद्धी माध्यमांनी विपर्यास करुन रंगवलं.

पक्षहिताला बाधा येण्याच्या उद्देशाने या बातम्या पेरण्याचे काम केलं, असा दावा बारणेंनी केला आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक झाली होती. या बैठकीत आमदार नीलम
गोऱ्हे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचं वृत्त होतं. मात्र शिवसेनेच्या धोरणाची आखणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मंत्री, खासदार, आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांची बैठक आयोजित केली होती, असं बारणेंनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंसमोर सेना मंत्री-आमदारांमध्ये खडाजंगी, निलम गोऱ्हे रडल्या!


पक्ष आणि नेत्यांविषयी गैरसमज होऊ शकतात, असं सांगत नीलम गोऱ्हे आणि श्रीरंग बारणे यांनी संयुक्त पत्र काढून या वृत्ताचं खंडन केलं. कोणतीही वादावादी-खडाजंगी झालेली नाही अथवा पक्षांतर्गत कोणताही वाद आम्हा दोघांमध्ये नाही, असं गोऱ्हे आणि बारणे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

नीलम गोऱ्हेंच्या वाढदिवसाला लक्ष्मण जगताप त्यांना भेटले होते. यावेळी निलम गोऱ्हेंनी जगताप यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. या गोष्टीवरुन खासदार श्रीरंग बारणेंनी गोऱ्हेंना उद्देशून “असे निर्णय घेण्याचे अधिकार नीलम गोऱ्हेंना कोणी दिले. आम्हाला शिवसेना शिकवू नये. आम्ही निवडणुका लढलो आहे.” असं म्हणाल्याचं वृत्त होतं. त्यानंतर नीलम गोऱ्हे रडल्याचीही माहिती होती.