मुंबई : मुंबईत विक्रोळीतील 'सिनर्जी कॅब' कंपनीच्या डायरेक्टरने कार खरेदी आणि भाड्याच्या रुपाने दरमहा उत्पन्न देण्याच्या आमिषाने लोकांना गंडा घातल्याचं समोर आलं आहे. 217 जणांची तब्बल अडीच कोटी रुपयांना फसवणूक करुन आरोपी मनिष सेठी पसार झाल्याचा आरोप आहे.


'सिनर्जी कॅब' या कंपनीचं कार्यालय विक्रोळी पूर्वमधील 'केतन टॉवर' इमारतीत आहे. आरोपी मनिष सेठीने लोकांकडून डाऊन पेमेंटच्या रुपाने पैसे घेतले. काही जणांना गाड्याही दिल्या, तर काही जणांना काही महिन्याचं आर्थिक उत्त्पन्नही दिलं. मात्र अचानक त्याने अनेकांचे पैसे घेऊन आफिस बंद करुन पळ काढला आहे.

मनिषने चारचाकी कार देण्याच्या नावाखाली डाऊन पेमेंट म्हणून कोणाकडून दोन लाख 20 हजार, कोणाकडून दीड लाख, कोणाकडून 90 हजार रक्कम घेतली. त्यांच्यासोबत पाच वर्षांचा करार केला. दरमहा भाडे, गाडीचा हफ्ताही कंपनी भरणार आणि पाच वर्षांनंतर गाडीही परत दिली जाणार, असं आमिष त्याने दाखवलं होतं.

काही जणांना गाड्या मिळाल्या, तर अनेकांना काही महिन्यांचं भाडंही मिळत होतं. मात्र काही काळानंतर भाडं मिळणं बंद झालं. डाऊन पेमेंट करुनही काही जणांना गाड्या मिळालेल्या नाहीत. मात्र कंपनी संचालक पसार झाला आहे.

आपले पैसे किंवा गाडी मिळावी यासाठी पीडित पोलिस ठाण्याचा चकरा मारत आहेत. पोलिसांनी तपास करुन आरोपीला पकडण्याचं आश्वासन दिलं आहे.