Mumbai Corona Cases :  राज्यात आणि विशेषकरुन मुंबईत कोरोनानं प्रकोप केला होता. यात मुंबईमध्ये तर कोरोनानं सर्वात जास्त कहर केला. त्यातही धारावीसारख्या भागात तर कधीकाळी हॉटस्पॉट होता. आज धारावीमध्ये फक्त एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेनं माहिती दिली आहे. धारावीत सध्या एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 19 असल्याचं बीएमसीकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने घातलेले निर्बंध आणि उपाययोजनांमुळं धारावीसारख्या हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी आज केवळ एका रुग्णाची नोंद झाली आहे. 


धारावीत आजवर एकूण 6829 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज दादरमध्ये 6 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. दादरमध्ये आतापर्यंत 9466 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर आज माहिममध्ये 17 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. माहिममध्ये आतापर्यंत 9802 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  


मुंबईतील कोरोनाचा आकडा एक हजारच्या खाली


राज्यभरात कोरोना उतरणीला लागला आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या मुंबईत देखील कोरोना रुग्णांचे दैनंदिन येणारे आकडे कमी होताना दिसत आहेत. काल मुंबईतील कोरोनाचा आकडा एक हजारच्या खाली आला.  मुंबईत काल 925 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1632 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 674296 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील  एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16580 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 477 दिवसांवर पोहोचला आहे.  


पुणे शहरात काल 384 नवीन रुग्णांची नोंद


पुणे शहरात काल 384 नवीन रुग्णांची नोंद झाली  तर 858 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 4 लाख 70 हजार 311 झाली आहे तर कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या 4 लाख 56 हजार 509 झाली आहे. कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 हजारांच्या खाली असून शहरात 5 हजार 518 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


राज्यात काल 15,169 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


राज्यात काल 15,169 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 29,270 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 285 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट होती. आजपर्यंत एकूण 54,60,589 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.54% टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 285 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.67 टक्के एवढा आहे.  


काल 'या' शहर आणि जिल्ह्यात एकही मृत्यू नाही
काल राज्यातील 12 शहर (महापालिका क्षेत्र) आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद सरकारी आकडेवारीनुसार नाही. चंद्रपूर शहर, भंडारा जिल्हा, बुलडाणा, अमरावती शहर, नांदेड शहर, परभणी शहर, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, धुळे शहर, मीरा भायंदर, भिवंडी, ठाणे शहर या ठिकाणी एकाही मृत्यूची नोंद सरकारी आकडेवारीनुसार करण्यात आलेली नाही. तर पनवेल शहर, मालेगाव शहर, जळगाव शहर, औरंगाबाद जिल्हा, लातूर शहर, अकोला शहर, वाशिम जिल्हा, नागपूर शहर, नागपूर जिल्हा, चंद्रपूर शहर या ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद सरकारी आकडेवारीत केलेली आहे.