मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये रात्रीपासून पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. पश्चिम उपनगरांमध्ये काही ठिकाणी रात्री उशिरा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र याचा वाहतुकीवर अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही.


मुंबईच्या अंधेरी, घाटकोपर, दादर, वांद्रे, चांदिवली, पवई, मरोळ, तसंच वसई, मिरा भाईंदरमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर सकाळीही कायम आहे. आकाश ढगाळलेलं असल्यानं आज दिवसभर पावसाची चिन्हं आहेत.

मुंबईसह उपनगरांना मागच्याच मंगळवारी 29 ऑगस्टला पावसानं झोडपून काढलं होतं. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. रस्ते, लोकलसेवा पावसामुळे बंद असल्यामुळे मुंबईकरांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. अनेकांना तर ऑफिसमध्ये किंवा स्टेशनवरच रात्र काढावी लागली होती.