Vile Parle Building Collapse : मुंबईमुळे मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलेय. सतंतधार पावसामुळे मुंबईत इमारत कोसळण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. विद्याविहार आणि विले पार्ले परिसरातही इमारत कोसळली आहे. विले पार्ले येथे दुपारी अडीच वाजता एका इमारतीचा भाग कोसळला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय. तर तीन जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी कपूर रुग्णलयात दाखल करण्यात आलंय. दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय.


मुंबईत दोन दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात आहे. पावसाच्या दुसऱ्याच दिवशी विले पोर्ले येथे इमारत कोसळली आहे. नानावटी रुग्णलयाजवळील G+2 इमारत कोसळली. सर्वांना वाचवण्यात यश आलेय.. मुंबई पोलीस आणि अग्निशामन दलाने शर्तीचे प्रयत्न करत तिघांचा जीव वाचवलाय. या दुर्देवी घटनेत दोन जणांचा मृत्यू झालाय. 65 वर्षीय प्रिशिला मिसाईटा आणि 70 वर्षीय रोबी मिसाईटा या दोघांचा मृत्यू झालाय. दुसरीकडे विद्याविहारमध्येही इमारत कोसळली असून तीन जणांना वाचवण्यात यश आलेय तर दोन जण अद्याप अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. एनडीआरएफ आणि अग्निशामन दल बचावकार्य करत आहेत. 


विद्याविहारमध्ये तीन मजली इमारत कोसळली -


विद्याविहार येथील तीन मजली प्रशांत निवास इमारत सकाळी खचली. इमारत खचून सात तास उलटले तरी बचावकार्य सुरुच आहे. सततच्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. तीन जणांना वाचवण्यात एनडीआरएफला यश आलेय. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या कुटुंबापैकी अलका आणि नरेश पालंडे अजून ही अडकले आहेत. एनडीएआरएफ ने शर्तीचे प्रयत्न करुनही या दोघांना बाहेर काढण्यात यश आले नाही.अखेर आता उभे असलेले दोन मजले पाडण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. विद्याविहार येथील ही इमारत 40 वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मुंबईमध्ये शनिवारपासून ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. अनेक भागात पावसामुळे पाणी साचले आहे. पावसामुळे इमारतीचा भाग खचल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील पहिल्याच पावसात या दुर्घटनेमुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


वसईमध्ये इमारतीचा सज्जा कोसळला


वसईमध्येही इमारतीचा काही भाग कोसळला आहे. वसईमधील एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून वसईमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक सुरू झालेल्या पावसाने वसईच्या हत्तीमोहला परिसरातील एका जर्जर इमारतीचा सज्जा कोसळला आहे. शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. अद्याप पावसाळा म्हणावा तसा सुरू ही झाला नाही तरी जून महिन्यातील पहिल्याच जोरदार पावसात एका इमारतीचा सज्जा कोसळल्याने जुन्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



शनिवारी पावसामुळे दोन जणांचा मृत्यू - 


पहिल्याच पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले होते. गोवंडीमध्येही पहिल्याच पावसात पाणीच पाणी झाले होते. तुंबलेले पाणी काढण्यासाठी मॅनहोलमध्ये (manhole) सफाई करण्यास उतरलेल्या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.सुधीर महेंद्र दास आणि रामकृष्ण  निरंजन दास असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.


पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई -


मुंबईतल्या पहिल्याच पावसाने नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल केलीय. अंधेरी भागात झालेल्या पावसाने पाणीच पाणी अशी स्थिती रस्त्यावर झाली होती. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की, लोकांना आधार देऊन सुरक्षित ठिकाणी घेऊन जावं लागत होतं. पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या एका महिलेला अशाच प्रकारे सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. काही चार चाकी वाहनांच्या टायरच्या लेव्हलपर्यंत पाणी आलेलं पाहायला मिळालं. दरम्यान पावसाचं स्वागत करा... बदनाम करु नका असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.. शिवाय जिकडे नाले तुंबतील तिथल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करु असंही मुख्यमंत्री म्हणाले...


आणखी वाचा :


Mumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईतील नालेसफाईची पोलखोल; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका तर मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा