कल्याण : कल्याणमध्ये एका शाळेची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये दोन महिला आणि एका चिमुकल्याचा समावेश आहे. तर एक महिला गंभीर जखमी आहे. जखमी महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.


मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळेच ही घटना घडली आहे.

Kalyan Wall Collapse | कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी | ABP Majha



दरम्यान अशीच एक घटना मुंबईतील मालाडमध्ये पिंपरीपाडा परिसरातील घडली आहे. या ठिकाणी झोपड्यांवर भिंत कोसळून 16 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत. रात्री दोन वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या याठिकाणी बचाव कार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

Malad Death | मालाडमध्ये मध्यरात्री भिंत कोसळून 16 रहिवाशांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता | ABP Majha



मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सर्व सरकारी-खासगी शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी रात्रीपासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे राज्य सरकारने मंगळवारी म्हणजे 2 जुलै रोजी रोजी  शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर हॅण्डलवरुन हे ट्वीट करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सर्व सरकारी, खासगी शाळांना सुट्टीची घोषणा करण्यात आलेली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने जाहीर केलं आहे.

रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबई शहरासाठी देण्यात आलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे.