मुंबई : मुंबईतील वाढते हवा प्रदूषण (Mumbai Pollution) सध्या चिंतेचा विषय बनला आहे. मुंबईत दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असून  नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार मुंबई (Mumbai News), नवी मुंबई (Navi Mumbai), ठाणे (Thane) आणि कल्याण (Kalyan) या चारही औद्योगिक क्षेत्रात जानेवारी महिन्यातील 31 पैकी 31 दिवस म्हणजेच, संपूर्ण महिना प्रदूषीत आढळल्याची माहिती समोर आली आहे. ग्रीन प्लॅनेट सोसायटीच्या सुरेश चोपणे यांनी अहवाल दिला आहे.  


मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण या चारही औद्योगिक क्षेत्रात महिन्याचे 31  दिवस प्रदूषीत आढळल्याचं अहवालातून समोर आले आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट  झाले आहे. मुंबईतील प्रदूषणास धूलीकण, वाहनांची वाढती संख्या, बांधकाम, ज्वलन कचरा कारणीभूत आहे. सोबतच मुंबईची भौगोलिक परिस्थिती, वाऱ्याची संथ गती आणि  हिवाळ्यातील कमी तापमान देखील कारणीभूत आहे. 


नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (National Clean Air Programme) अंतर्गत प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.  त्याची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे. तसेच दिल्लीप्रमाणे अनेक अन्य उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचं अहवालातून स्पष्ट झाले आहे. 


हवा गुणवत्ता निर्देशांक खालीलप्रमाणे : 


 मुंबई (पवई केंद्र)


● चांगला निर्देशांक (Good) : 00 दिवस
● समाधानकारक-(Satisfactory) : 02 दिवस
● साधारण प्रदूषण(Moderate) :13 दिवस
● जास्त प्रदूषण ( Poor) : 16 दिवस
● धोकादायक प्रदूषण आढळले नाही


 नवी मुंबई (महापे केंद्र)


●चांगला निर्देशांक (Good) : 00 दिवस
●समाधानकारक-(Satisfactory) : 01 दिवस
●साधारण प्रदूषण (Moderate) :18 दिवस
●जास्त प्रदूषण ( Poor) : 12 दिवस
● धोकादायक प्रदूषण आढळले नाही


 ठाणे (पिंपलेश्वर मंदिर केंद्र )


●चांगला निर्देशांक (Good) : 00 दिवस
●समाधानकारक (Satisfactory) : 00 दिवस
●साधारण प्रदूषण (Moderate) : 14 दिवस
●जास्त प्रदूषण ( Poor) : 14 दिवस
● धोकादायक प्रदूषण (Very Poor) : 03 दिवस 


 कल्याण (खडकपाडा केंद्र)


●चांगला निर्देशांक (Good) : 00 दिवस
●समाधानकारक-(Satisfactory) : 00 दिवस
●साधारण प्रदूषण (Moderate) : 22  दिवस
●जास्त प्रदूषण ( Poor) : 09 दिवस
● धोकादायक प्रदूषण आढळले नाही


दिवसेंदिवस मुंबईतील हवा गुणवत्ता खालवत चालल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा तोंड द्यावं लागत आहे. मुंबईत अनेक रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे या सारख्या समस्या वाढल्या आहेत. अद्याप राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून वाढत्या प्रदूषणावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. वाईट श्रेणीतील हवा असलेल्या ठिकाणी हृदय आणि फुफ्फुसाचे विकार बळवण्याचा अंदाज देखील तज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्याच्या काळात खासकरुन श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.