Mumbai Rains LIVE : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस, अंधेरी सब वे मध्ये तीन ते चार फूट पाणी

Mumbai Rains LIVE : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

स्नेहा कदम, एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jul 2022 06:22 PM
पालघर जिल्ह्यातील सर्व भागात पावसाने जोरदार हजेरी लावली





पालघर जिल्ह्यातील सर्व भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पालघर मनोर डहाणू बोईसर जव्हार तलासरी कासा भागात जोरदार पाऊस सुरू असून मनोर,चिंचणी भागात रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे


 

 



 


नवी मुंबई , पनवेलमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग

दोन दिवसांपासून नवी मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. पनवेल, कामोठे, वाशीसह इतर ठिकाणी पावसाने हजेरी लावली.  कुठेही पाणी साचल्याची घटना घडलेली नाही

कणकवलीमधील सावडाव धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा पडत असलेल्या दमदार पावसामुळं प्रवाहित झाला आहे. सावडाव धबधबा 30 फूट उंच काळ्या कातळावरुन फेसाळत कोसळत आहे. हे कातळ 60 ते 70 फूट रुंदीचे आहे. गर्द वनराईतुन वाहत फेसाळत कोसळणारा हा धबधबा पर्यटकांसाठी अतिशय सुरक्षित धबधबा आहे. मुंबई गोवा महामार्गावरून सावडाव धबधबा जवळ असल्याने पर्यटकांचं आवडीचं ठिकाण आहे. 

कल्याण डोंबिवलीत पावसाची रिपरिप 

Kalyan Rain : कल्याण डोंबिवलीत रात्रभर पावसाने विश्रांती घेतली होती. आज सकाळपासून पुन्हा कल्याण डोंबिवलित पावसानं हजेरी लावली आहे. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. कालपासून सुरु झालेल्या पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. 

संपूर्ण कोकणात पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट

आज सकाळपासूनच मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरुआहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. काही ठिकाणी वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. दरम्यान, कोकणात देखील पाऊस सुरु आहे. संपूर्ण कोकणासाठी पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी

रायगड जिल्ह्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, पेण , उरण, पनवेल परिसरात पावसानं हजेरी लावली. तर काही भागात रिमझिम पावसाची हजेरी आहे. 


 

30 सप्टेंबरपर्यंत वरंध घाटातील अवजड वाहनांची वाहतूक बंद
आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत म्हणजे जवळपास तीन महिने वरंध घाटातील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.  तर या कालावधीत  midc च्या अतिवृष्टीच्या (हाय अलर्ट ) इशाराच्या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून पुण्याकडे जाण्यासाठी महाड - माणगांव - निजामपूर - ताम्हाणी घाट - मुळशी - पिरंगुट - पुणे या मार्गाने जाता येणार आहे. तर कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा - पोलादपूर - खेड - चिपळूण - पाटण - कराड - कोल्हापूर या मार्गाने प्रवास करावा. गतवर्षीच्या अतिवृष्टी व महापुराची परिस्थिती पाहता, या घाटातील दरड खाली येऊन कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी घाट बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत घेण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळं अंधेरी सब वे मध्ये तीन ते चार फूट पाणी

मुसळधार पावसामुळं अंधेरी सब वे मध्ये तीन ते चार फूट पाणी साचलं आहे. हा मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. 

Mumbai Rains LIVE : मागील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी, पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज

Mumbai Rains LIVE : मुंबईत आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. काल दिवसभर मुंबईत पावसाची संततधार बघायला मिळाली. काल रात्रीच्या पावसामुळे सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं बघायला मिळालं. सकाळपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. किंग्ज सर्कल या भागात जोरदार पावसामुळे पाणी साचत असतं, मात्र पालिकेकडून पाण्याच्या साठवणुकीच्या टाक्या बसवण्यात आल्याने अद्याप पाणी साचलं नाही. मात्र, पाण्याच्या टाकीत पावसाच्या पाण्याचा जोर मोठा बघायला मिळत आहे. मागील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी झाली आहे. पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

मुंबईत आज सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, सखल भागात साचलं पाणी

मुंबईत आज सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसामुळं मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्री उशिरा झालेल्या पावसामुळं सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. आज पहाटे 5 वाजता पुन्हा एकदा मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तसेच मुसळधार पाऊस झाल्यास मुंबईतील सर्व सखल भाग, अंधेरी सबवे, किंग सर्कल, हिंदमाता, सायन, कुर्ला, परळ या भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.




 

Mumbai Rains LIVE : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, अंधेरी ते दादर परिसरात पावसाची हजेरी
 दादर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात

 मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दादर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. सायन, कुर्ला, प्रभादेवी, लालबाग परिसरात देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

Mumbai Rains LIVE : वांद्रे पूर्व कलानगर जंक्शनच्या समोरच्या मुख्य रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी भरलं

Mumbai Rains LIVE : मुंबई आज पहाटेपासून सुरु असलेल्या पावसामुळे वांद्रे पूर्व कलानगर जंक्शनच्या समोरच्या मुख्य रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी भरलं आहे. पाणी साचल्यामुळे गाड्या सुद्धा बंद पडताना पाहायला मिळत आहेत. सकाळची वेळ आहे, मुंबईकर कामासाठी निघत आहेत, मात्र जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी भरलं तर मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

Mumbai Rains LIVE : मुंबईत मागील 24 तासात अतिवृष्टी, कुलाबा इथे 208 मिमी तर सांताक्रूज इथे 160 मिमी पावसाची नोंद 

Mumbai Rains LIVE : पावसाची आकडेवारी : 1 जुलै (30 जून सकाळी 8 वाजल्यापासून ते 1 जुलै सकाळी 7.30 पर्यंत) 


मुंबई (कुलाबा) - 208 मिमी 
मुंबई (सांताक्रुज) - 160 मिमी 


मुंबईत मागील 24 तासात अतिवृष्टी

Mumbai Rains LIVE : मुंबईत आज पहाटेपासून पुन्हा पाऊस

Mumbai Rains LIVE : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या जोरदार पाऊस आहे. लालबाग, परळ, वरळी, दादर, सायन, कुर्ला, अंधेरी, गोरेगाव, बोरीवली, वांद्रे मुलुंड या सर्व परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होता. मात्र मध्यरात्री पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यामुळे सखल भागांमधून पाण्याचा निचरा झाला. पण आज पहाटे पुन्हा मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर पुन्हा मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी भरु शकतं.

पार्श्वभूमी

Mumbai Rains LIVE : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची बॅटिंग सुरु आहे. लालबाग, परळ, वरळी, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, वांद्रे, कुर्ला, सायन, दादर, मुलुंड या सर्व परिसरामध्ये वरुणराजा बरसत आहे.  मुसळधार पावसामुळे मुंबईच्या सखल भागामध्ये सर्व ठिकाणी पाणी साचलं होतं, मात्र मध्यरात्री पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यामुळे सखल भागांमधून पाणी निघून गेलं.


कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरूवारी सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला होता. यानंतर पुढील चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्ट, तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मध्यरात्री मुंबईत पाऊस थांबला होता. मात्र सकाळी काही वेळातच पुन्हा पावसाला सुरुवात झाली.


मुंबईत सलग 12 तास पाऊस, आसपासच्या परिसरात साचले पाणी 
गुरूवारी मुंबईत सलग 12 तास पाऊस झाल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात पाणी साचले आहे. पहिल्यास मुसळधार पावसात मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील पावसाची आकडेवारी समोर आली आहे. मुंबईत सकाळी 8 ते रात्री 8.30 पर्यंत बारा तासात कुलाबा  176 मिमी पावसाची नोंद करण्यात आला आहे. मुंबईतील सांताक्रुज 137 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.


पालिकेचा नालेसफाई दावा फोल 
काल झालेल्या पावसामुळे अंधेरी सब वे, हिंदमाता, सक्कर पंचायत वडाळा, एसआयईएस कॉलेज वडाळा, किंग्ज सर्कल, सायन आदी काही सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरात बुधवारी रात्रभर पावसाच्या रिमझिम सरी बरसत आहे.  तर अधून मधून जोरदार पाऊस आहे. काल दुपारनंतर वसई विरार मध्ये पावसाने जोर धरलेला पाहायला मिळाला आहे.  वसई, नालासोपारा आणि विरार मधील सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली.  यामुळे  पालिकेचा नालेसफाई दावा फोल ठरल्याच दिसून येत आहे. 


पुढील तीन ते चार दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार
दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं येत्या 3 ते 4 दिवसांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या परिस्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड
गेल्या 12 तासांत मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे आणि त्यामुळे मुंबई जाम झाली आहे. अंधेरी, दादर, परळ भागात पाणी साचलं आहे. दादर आणि परळमध्ये गुरूवारी पाच किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्यात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. मध्य रेल्वे मार्गावर दादर स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाल्यानं लोकलच्याही रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवासी लोकलमध्ये अडकले होते. मुंबईत रस्ते जाम आणि लोकल ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले, काल झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबई तुंबली आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.