Mumbai AC Local : मध्य रेल्वेवर (Central Railway) नव्याने सुरू केलेल्या दहा एसी लोकलच्या (Mumbai AC Local) फेऱ्या रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या आंदोलनानंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. एसी लोकलमुळे सर्वसामान्यांचा खोंळबा होत असून एसी लोकलचे दरही (AC Local Ticket Fare)  सामन्यांना न परवडणारे आहेत.


स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांनी मध्य रेल्वे मार्गावर आणखी दहा वातानुकुलित लोकल चालवणार असल्याचे जाहीर केले. या वातानुकूलित लोकल साध्या लोकांच्या जागी चालवण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने  प्रवासी संघटना नाराज झाल्या. साध्या लोकलच्या फेऱ्या रद्द करुन त्याऐवजी रोज दहा एसी लोकल ट्रेन्स चालवण्याच्या मध्य रेल्वेच्या निर्णयाविरोधात बदलापुरातल्या संतप्त प्रवाशांनी आंदोलन केलं. अखेर या आंदोलनला यश आले असून या सेवा तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत.  






  मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विभागीय व्यवस्थापक कार्यालयात काल दुपारी आमदार जितेंद्र आव्हाड यांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत दोन तास बैठक झाली. साध्या लोकलमधून सुमारे चार ते पाच हजार प्रवासी प्रवास करतात. त्यामुळं एक साधी लोकल रद्द केल्यानंतर या हजारो प्रवाशांनी प्रवास कसा करायचा, असा प्रश्न आव्हाड यांनी या बैठकीत उपस्थित केला होता. त्यानंतर आता नव्याने सुरू केलेल्या एसी लोकल रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांच्याआक्रमक भूमिकेनंतर अखेर रेल्वे प्रशासनानं नमतं घेत एसी लोकल उद्यापासून रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. 


ठाणे आणि त्यापुढील डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर अशा भागात राहणाऱ्या प्रवाशांसाठी पाचवी आणि सहावी मार्गिका एक वरदान असेल असे भसवण्यात आले होते. मात्र जेव्हा पासून या दोन मार्गिककाचे लोकार्पण झाले आहे, तेव्हापासून फक्त एसी लोकलच चालवल्या गेल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही मर्गिकांचा प्रवाशांना तसा काहीच उपयोग झाला नाही.   एसी लोकलला सर्वच मार्गांवर प्रवाशांचा थंड प्रतिसाद आहे. मुंबईतील सर्वसामान्य  प्रवाशांचा विचार  केला तर या प्रवाशांसाठी एसी लोकलचे तिकीट किंवा पास काढणे म्हणजे महिन्याभराचे दोन वेळेचे जेवायचे पैसे खर्च करण्यासारखेच आहे.