चिनी शालेय वस्तूंवर बहिष्कार टाका, मुख्याध्यापक संघटनेचं आवाहन
एबीपी माझा वेब टीम | 10 Jul 2017 08:34 PM (IST)
मुंबई : मुंबईतल्या शाळांमध्ये 'मेड इन चायना'विरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे. मुंबईतल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी चिनी वस्तू आणू नयेत, असं आवाहन मुख्याध्यापक संघटनेनं केलं आहे. भारत आणि चीन या दोन देशांतील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात येत आहे. यातून विद्यार्थ्यांना देशभक्तीची शिकवण तर मिळेलच, शिवाय स्वदेशीचा वापरही वाढेल असा विश्वास या संघटनेकडून व्यक्त करण्यात येत आहे. फक्त मुंबईच नाही, तर महाराष्ट्रभरातील शाळांनाही हे आवाहन करणार आहोत. राज्यभरातील आमचे प्रतिनिधी या एल्गारात सहभागी होणार असल्याचं मुंबई मुख्याध्यापक संघटनेचं म्हणणं आहे. विद्यार्थी आणि पालकांनी यापुढे वॉटर बॉटल, डबा, कंपास, रंग, स्केचपेन, पट्टी, पॅड, रबर यासारखं चिनी बनावटीचं शालेय साहित्य घेऊ नये, असं आवाहन यामध्ये करण्यात आलं आहे.