नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या खरगोनमधून एका संशयिताला मुंबई एटीएसनं अटक केली आहे. हा तरुण आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. आवेश शेख असं संशयिताचं नाव असून गेल्या काही दिवसांपासून तो मुंबईत राहत असल्याची माहिती आहे.


आवेशचं आजोळ मुंबईचं असून त्याचं एम.टेकपर्यंत शिक्षण झाल्याचं समोर आलं आहे. एटीएसच्या कारवाईत तरुणाचा मोबाईल आणि लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे. भोपाळ-उज्जैन ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटात नऊ जण जखमी झाले होते. ट्रेनमध्ये गन पावडर मिळाल्यामुळे हा हल्ला दहशतवाद्यांनी केला असल्याचा अंदाज मध्य प्रदेश पोलिसांनी व्यक्त केला होता.

त्यानंतर लखनऊमध्ये झालेल्या चकमकीत एका संशयित दहशतवाद्याला ठार मारल्यानंतर कानपूर, इटावा, होशंगाबादमधून काही जणांना अटक करण्यात आली होती. आयसिसशी संबंधित काही जणांचा हात यामागे असल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.