नवी मुंबई : ऐरोली, घणसोली भागात गेल्या काही महिन्यांपासून वीज खंडित होण्याची समस्या वाढली आहे. रात्री अचानक वीज खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत येथील स्थानिक आमदार संदीप नाईक यांनी अधिवेशनात नाराजी व्यक्त करत स्थानिकांचा प्रश्न मांडला, त्यानंतर एमएसईबीकडून या भागाचा पाहणी दौरा करण्यात आला. या पाहणी दौऱ्यानंतर घणसोली भागात नवीन विज वाहिन्या जोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


नोसिल कंपनीजवळील सबस्टेशनमधून घणसोली गावामध्ये जोडण्यात येणार्‍या 22 के.व्ही.च्या केबलद्वारे 20 ट्रान्सफॉर्मरना वीजपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे ऐरोली सबस्टेशनमधून घणसोली, तळवली, रबाळे, नोसिल नाका, गोठीवली या भागांना होणारा वीजपुरवठा विभागला जाणार आहे. त्यामुळे फिडर ट्रिप होण्याचे प्रकार कमी होतील. वीजेचे उघडे डिपी बॉक्स, उघडया केबल इत्यादींच्या दुरुस्तीसाठीदेखील महावितरण कंपनीने खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे.