मुंबई : राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी होणार असल्याचं यापूर्वीच जाहिर करण्यात आलं आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल 3 लाख 80 हजारांच्या आसपास विद्यार्थी बसणार आहेत. या परीक्षेला बसणारे अनेक विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून परीक्षांची तयारी करण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये येत असतात. मात्र, सध्या कोरोना संसर्गामुळे मुलांची अडचण लक्षात घेतं केंद्रीय लोकसेवा आयोगाने ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून घेण्याची संधी दिली. त्याचप्रकारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.


विद्यार्थी अभ्यास करत असलेलं ठिकाणचं परीक्षा केंद्र म्हणून निवडत असतात. परंतु, सध्या राज्यभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासोबतच मागील साडेतीन ते चार महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी आपल्या मूळ गावी परत गेले आहेत. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे हे विद्यार्थी आगामी 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी त्यांनी निवडलेल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित न राहू शकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलून घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली. या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी केंद्र बदलून आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणचे केंद्र मिळावं असं देखील युवा सेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. यंदा महाराष्ट्रातून या परीक्षेला तब्बल 3 लाख 80 हजार विद्यार्थी बसणार आहेत.


अशा परिस्थितीत विद्यार्थी कोरोना बाधित होण्याची शक्यता
युवा सेनेचे मुंबई विद्यापीठाचे सिनेट प्रदीप सावंत, महादेव जगताप, राजन कोळेंबेकर, शीतल देवरूखकर आणि शशिकांत झोरे यांनी ही मागणी केली आहे. जर ही मागणी मान्य करण्यात आली तर या तब्बल 3 लाख 80 हजार विद्यार्थ्यांना केंद्र बदलून देण्यात येईल आणि त्यांना आपल्या सोयीच्या ठिकाणी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा देता येईल. सध्या राज्यात कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतला नाही तर अशा विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या ठिकाणी परीक्षेसाठी यावं लागेल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागेल. अशा परिस्थितीत विद्यार्थी कोरोना बाधित होण्याची शक्यता देखील नाकारता येतं नाही. असं युवा सेनेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.


आदिवासी तरुणाचा राष्ट्रीय धावपटू ते नायब तहसीलदार पर्यंतचा संघर्षमय प्रवास


लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा : युवासेना
या मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवल्यानंतर मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत म्हणाले, की सध्या दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईत याचं प्रमाण सर्वाधिक आहे. सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाचं प्रमाण सप्टेंबर महिन्यांपर्यंत कमी होईल असं वाटतं नाही. लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे. ही परीक्षा जुलै महिन्यांत होईल असं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतु, बिघडणारी परिस्थिती पाहता आयोगाने परीक्षा पुढे ढकलली आणि ती सप्टेंबर महिन्यांत होईल असं जाहिर केलं. परंतु, सध्याच्या परिस्थितीवरुन वाटतं नाही की ही परीक्षा सप्टेंबर महिन्यांत देखील होईल. परंतु, जर ही परीक्षा सप्टेंबर महिन्यांत झाली तर असे अनेक विद्यार्थी आहेत. जे मुंबई, पुण्यासारख्या शहरात परीक्षेची तयारी करण्यासाठी येतं असतात. जे सोयीचे परीक्षा केंद्र म्हणून ज्या ठिकाणी ते अभ्यास करत आहेत. त्याचं ठिकाणचे परीक्षा केंद्र निवडतात. जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतला नाही तर या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसेल. त्यामुळे आयोगाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही युवा सेनेने केली आहे.


वॉचमनचा मुलगा झाला नायब तहसीलदार! जिद्द, मेहनत आणि संघर्षाचं प्रतिक दत्ता बोरसे | स्पेशल रिपोर्ट