मुंबई : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ईव्हीएम मशीनमध्ये मोठा घोळ असल्याचं म्हटलं आहे. आपण निवडून आलो असलो तरी मिळालेली मते आणि मतदानात मोठी तफावत असल्याचा आरोप उदयनराजेंनी केला आहे. त्यामुळे आपली फेर निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी, असं आवाहन त्यांनी निवडणूक आयोगाला केलं आहे.


उदयनराजे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमबाबत आरोप केले आहेत. ईव्हीएममधील हा घोळ म्हणजे देशातील सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक असल्याचं उदयनराजेंनी म्हटलं आहे. माझी फेर निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी. या निवडणुकीत जर असाच फरक आला तर मी माझ्या मिशाच काय माझ्या भुवया ही काढून फिरेन, असं खुलं आव्हान उदयनराजे यांनी निवडणूक आयोगाला दिलं आहे.



ईव्हीएम मशीनमधील घोळ म्हणजे देशातील सामान्य नागरिकांची फसवणूक आहे. या प्रकरणावर देशातील नागरिकांनी आता बोललं पाहिजे. यावर देशभरात खुली चर्चा झाली पाहिजे, असंही उदयनराजे यांनी म्हटलं.


आपल्या देशात ईव्हीएमवर पाच हजार कोटी रुपये वायफळ खर्च झाला असून हे प्रकरण म्हणजे 'आबरा का डाबरा' असं आहे. मशीनमध्ये जर वायरस गेला असं जर कोणी म्हणत असेल, तर देशाचे सभागृह चालवणाऱ्यांचा हा वायरस आहे का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे.