मुंबई : मुंबईत दिव्यात मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसचा मोठा अपघात होता होता टळला आहे. गाडीच्या लोको पायलटने ट्रॅकवर 15 फुटी जुना रुळ ठेवल्याचं पाहिलं आणि तात्काळ गाडी थांबवली. यामुळे मोठा अनर्थ होता होता टळला.




स्थानिकांच्या मदतीने रुळ बाजूला करण्यात आला आणि गाडी पुढे काढली. हा घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मागच्या 3 महिन्यात रेल्वेचे 3 मोठे अपघात घडले, ज्यामध्ये अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे हे अपघात आहेत, की घातपात, या शंकेने पुन्हा डोकं वर काढलं आहे.

रेल्वे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर?

रविवारीच ओडिशाच्या सीमेजवळ असलेल्या आंध्र प्रदेशमधील कुनेरु स्टेशनजवळ जगदलपूर-भुवनेश्वर एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरुन घसरले होते. या रेल्वे अपघातात 39 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता.

कानपूरमध्येही नोव्हेंबरमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेमागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहार पोलिसांनी मंगळवारी तीन जणांना अटक केली असून त्यांचा संबंध कानपूर रेल्वे अपघाताशी आहे.

कानपूरसारखीच दुर्घटना रक्सौल-दरभंगा रेल्वे मार्गावर घडवल्याचा संशय या तिघांवर आहे. कानपूर अपघातातही त्यांचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

इंदूर-पटना एक्स्प्रेसचा 20 नोव्हेंबर 2016 रोजी कानपूरच्या पुखराया स्टेशनजवळ भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये 150 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

या दुर्घटनेमागे एक रॅकेट कार्यरत असून त्याचा म्होरक्या दुबईत आहे, जो भारतविरोधी कारवायांसाठी नेपाळमधील भाड्याच्या गुंडांचा वापर करत आहे. शमसुल होदा असं त्याचं नाव असून तो पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयशी संबंधित असल्याचं म्हटलं जातं.

संबंधित बातम्या :

हिराखंड एक्स्प्रेसचे 8 डबे घसरुन 39 प्रवाशांचा मृत्यू


पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे 14 डबे घसरले, 63 प्रवाशांचा मृत्यू


‘डबे घसरले नि डोळ्यादेखत त्या चिमुरडीच्या शरीराचे दोन तुकडे’


जखमेवर मीठ, कानपूर ट्रेन दुर्घटनेतील जखमींना जुन्या नोटा वाटप