मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर सरकारविरोधात मनसेनेनं उद्या (५ ऑक्टोबर) 'संताप मोर्चा'चं आयोजन केलं आहे. हा मोर्चा मेट्रो जंक्शन ते चर्चगेट स्टेशनपर्यंत असणार आहे. मोर्चा सकाळी साडेअकरा वाजता सुरु होणार आहे.


मोर्च्यात सहभागी होण्यासाठी मनसेनं सोशल मीडियातूनही आवाहन केलं आहे.


हा मोर्चा फक्त रेल्वे प्रशासनाविरोधात नाही तर इतर विषयांबाबतही असल्याचं मनसेनं म्हटलं आहे. सध्या देशात एक अघोषित आणीबाणी आहे आणि त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. अशी भूमिका मनसेनं घेतली आहे.

‘सोन्यासारखी सत्ता जनतेने यांच्या हातात दिली, आधीच्या सरकारपेक्षा काही चांगलं घडेल असा आशावाद निर्माण झाला आणि तो त्यांनी इतक्या लवकर उद्धवस्त केला.’ अशी टीकाही मनसेनं सरकारवर केली आहे.

मनसेच्या या मोर्चाला आता नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.