कल्याण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केल्याचा आरोप करत मनसेनं डोंबिवलीत आज चक्क गाजराचा केक कापत त्यांचा निषेध केला. कल्याण-डोंबिवलीकरांना मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षात केवळ गाजर दिल्याचा आरोप मनसेनं यावेळी केला.


कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीपूर्वी 2015 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत विकास परिषद घेतली होती. यात केडीएमसीला विकास आराखड्याच्या माध्यमातून 6,500 कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र आजतागायत यापैकी एकही रुपया केडीएमसीला मिळालेला नसून मुख्यमंत्र्यांनी जनतेची फसवणूक करत गाजर दाखवल्याचा मनसेचा आरोप आहे. याचाच निषेध करण्यासाठी मनसेनं आज डोंबिवलीत गाजराचा केक कापला. यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली व तीन वर्षांनंतरही पैसे न आल्याचा मनसेकडून निषेध केला गेला.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी डोंबिवलीत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी 6 हजार 500 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती.  या घोषणेला तीन वर्षे झाली, मात्र कल्याण-डोंबिवलीकरांच्या पदरात काहीच पडलेले नाही.  मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कल्याण-डोंबिवलीकरांनी पालिका निवडणुकीत भाजपला भरभरून साथ दिली व भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढही झाली. मात्र गेल्या तीन वर्षांत या पॅकेजमधील फुटकी कवडीही शहरांच्या वाट्याला आलेली नाही.