सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही मनसेची नऊ थरांची दहीहंडी?
एबीपी माझा वेब टीम | 23 Aug 2016 04:22 AM (IST)
ठाणे : दहीहंडीसंदर्भात सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या नियमांचं मनसे उल्लंघन करणार की काय, असा प्रश्न ठाणेकरांना सतावत आहे. ठाण्याच्या नौपाडा परिसरात मनसेकडून 9 थरांच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. नऊ थरांच्या दहीहंडीचं आयोजन करण्यासंदर्भातले होर्डिंग्ज ठाण्यात काही ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यामुळे 20 फुटांपेक्षा अधिक उंच दहीहंडीचे थर लावू नयेत, हे सुप्रीम कोर्टाचे आदेश पायदळी तुडवले जाण्याची चिन्हं आहेत. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस पाठवून नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही या नोटिशीद्वारे मनसैनिकांना देण्यात आला आहे.