मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुढाकारातून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाआघाडीत  घेण्याचे प्रयत्न फोल ठरले आहेत. कारण काँग्रेसकडून मनसेला महाआघाडीत घ्यायला काँग्रेसने स्पष्ट नकार कळवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी मनसेला महाआघाडीत घ्यावे म्हणून प्रस्ताव ठेवला होता. पण काँग्रेसने मनसे बरोबर वैचारिक मतभेद आहेत. समविचारी पक्षांची आघाडी असावी असा महाआघाडीचा उद्देश आहे. त्यामुळे मनसेला आघाडीत स्थान नाही, असे स्पष्टपणे राष्ट्रवादीला कळवले असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केले आहे.

समविचारी पक्षांनी एकत्र येत महाआघाडी स्थापन झाली आहे. मनसे आणि आमच्या विचारधारेत फरक आहे. त्यामुळे आघाडीमध्ये मनसे नको ही भूमिका राष्ट्रवादीला कळवली आहे, असे चव्हाण म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांना चार जागा दिल्या आहेत.  त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत, असेही चव्हाण यांनी सांगितले.