MNS MVA Satyacha Mocha Mumbai: निवडणूक आयोगाच्या (Election Commission) विरोधात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांनी एकत्र येत मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’ काढला आहे. मतदार यादीतील गोंधळ, दुबार नावे, मतचोरी तसेच निवडणुकांमधील कथित गैरव्यवहार यांच्या विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), तसेच काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच मनसे आणि महाविकास आघाडीच्या मोर्चात एका व्यक्तीने 'यमराज'ची वेशभूषा साकारत सहभाग घेतला. यावेळी 'यमराज' यांनी मतदार यादीच्या घोळावरून तुफान हल्लाबोल केलाय. 

Continues below advertisement


MNS MVA Satyacha Mocha Mumbai: नेमकं काय म्हणाले यमराज? 


यमराजची वेशभूषा साकारलेल्या व्यक्तीने म्हटले की, मी यमराज आहे. मी यम लोकहून आलो आहे. या लोकांनी बोगस मतदान केले आहे. जे लोक या जगामध्ये नाहीच त्यांना मी घेऊन जाणार आहे. एकेकाचे वय 117, 124, 90, 80 वर्ष आहे. ते कुठे आहेत? हे लोक बोगस मतदान करतात. त्यांना मी घेऊन जाणार. जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा मी या पृथ्वीवर येत राहील. लोकांवर अन्याय होत आहे. ते एक जण बोलतात झुकेगा नाही, आता त्यांना मी सर्वात पहिले घेऊन जाणार. माझ्याकडे सगळ्यांची लिस्ट आलेली आहे. मी पुन्हा येईन म्हणतात तर मी त्यांना पुन्हा घेऊन जाईल. माझे देखील दोन-तीन ठिकाणी नाव आले आहे. मला त्यांनी सोडलं नाही तर मी त्यांना कसे सोडू? मृत असूनही अजून देखील जे लोक मतदान करत आहेत, त्यांना घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे, असे म्हणत त्यांनी मतदार यादीतील घोळावर संताप व्यक्त केलाय.


विरोधकांच्या नेमक्या मागण्या काय? (MNS And Mahavikas Aghadi Demands)


1. मतदारयाद्या अद्ययावत करा.


2. मतदारयाद्यांतील दुबार नावे काढा.


3. मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा.


4. सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा.


कसा असेल मोर्चाचा मार्ग? (Raj Thackeray Uddhav Thackeray Morcha Route)


- हा मोर्चा फॅशन स्ट्रीट इथून निघेल आणि पुढे मेट्रो सिनेमा आणि त्यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जाईल.


- मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इथे स्टेज उभारण्यात आला आहे या ठिकाणी प्रत्येक पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची भाषण होतील.


- ज्यामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात शेकाप जयंत पाटील व इतर काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणे होतील.


- राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारा विरोधात हा मोर्चा असणार आहे... मत चोरी, दुबार मतदार, मतदार यादीतील घोळ या सगळ्याची पुरावे राज्य निवडणूक आयोगाला देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हा मोर्चा काढण्यात येतोय.


- राज्य निवडणूक आयोग एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम जाहीर करत असताना जोपर्यंत मतदार याद्या अपडेट केला जात नाहीत आणि हा घोळ संपूर्णपणे दूर केला जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, या मतावर विरोधक ठाम राहणार.


- या मोर्चानंतर हा मुद्दा अधिक आक्रमकतेने पुढे नेण्यासाठी उद्या सर्व पक्षांची मिळून अधिकृत भूमिका मांडली जाणार असल्याची माहिती आहे.



आणखी वाचा 


Raj Thackeray: एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...