MNS Against Brijbhushan Singh : राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पाच जून रोजी अयोध्या दौरा (Ayodhya Tour) होणार होता. या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी या दौऱ्याला विरोध केला होता. बृजभूषण आणि कार्यकर्त्यांनी थेट मनसे अध्यक्ष यांना 'चुहा है' म्हणत टीका केली होती. बृजभूषण सिंह यांच्या कार्यकर्त्यांनी खालच्या पातळीची टीका करत थेट आव्हान दिलं होतं. याविरोधात आज मुंबईत मनसेकडून पोलिसात तक्रार करण्यात आली आहे आणि कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

 

काय आहे तक्रारीत

खासदार बृजभूषण सिंह आणि त्यांचे कार्यकर्ते  मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठी भाषिकांच्या विरोधात वारंवार चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ते निर्माण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी मनसेकडून  दादर पोलिस ठाण्यात तक्रार देत करण्यात आली.  मनसे जनहित कक्षाचे सरचिटणीस रवी पाष्टे आणि खेड गल्ली मुंबई येथील उपशाखा अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी ही तक्रार  केली आहे. या तक्रारीची प्रत गृहमंत्री आणि  पोलीस आयुक्त यांना देखील देण्यात आली आहे.

 

राज ठाकरे यांनी आपण अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे घोषित केलं होतं. त्यानंतर खासदार बृजभूषण सिंह यांनी भाजपला न जुमानता राज ठाकरे यांच्याविरोधात रान उठवले. जो पर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीय जनतेची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना इकडे पाय ठेवू देणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागू शकत नसाल तर मग साधू संतांची माफी मागा, मोदींची माफी मागा, असंही ते बोलले होते. यानंतर बृजभूषण यांनी राज्यभर विरोधासाठी दौराही केला. प्रत्येक वेळी राज ठाकरेंच्या विरोधात बृजभूषण आणि कार्यकर्ते हे आक्रमकपणे बोलताना पाहायला मिळाले. यानंतर राज ठाकरेंनी तब्येतीचं कारण देत आणि दौऱ्यानिमित्त षड्यंत्र केल्याचा आरोप करत दौरा रद्द करण्याचे सांगितले. मात्र यानंतरही बृजभूषण यांनी आणि कार्यकर्त्यांनी टीका सुरूच ठेवली.

 

तक्रारीत म्हटलंय की, राज ठाकरेंवर वारंवार टीका होत आहे, त्यामुळे आमच्या भावना दुखवत आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. म्हणून सिंह आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. तसेच दुसरीकडे बृजभूषण सिंह हे मुंबईत येणार असल्याची चर्चा आहे. जर ते मुंबईत आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेने केलेल्या तक्रारीवर पोलीस आणि सरकार पुढे काय भूमिका घेतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.