कल्याण : कर्जाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे. डोंबिवलीत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.


महाराष्ट्रातील शेतकरी शेतीसाठी आधी बँकेकडून कर्ज घेतो. मात्र दुष्काळामुळे कर्जाची परतफेड होऊ शकत नाही. त्यामुळे बँक दुसऱ्यांदा कर्जही देत नाही. मग सावकारी कर्जाच्या विळख्यात शेतकरी अडकतो आणि आत्महत्येसारखं पाऊल उचलतो.


या सगळ्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारकडून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 6 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. शिवाय शेतमजुरांनाही रोजगार हमी योजनेतून पगार देण्याची सरकारची योजना आहे, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.


डोंबिवली मध्यवर्ती सहकार भंडार या संस्थेच्या कार्यक्रमासाठी ते डोंबिवलीत आले होते. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, रिझर्व्ह बँकेचे संचालक्ष सतीश मराठे, मध्यवर्ती भंडार संस्थेचे प्रसाद गोगटे आदी मान्यवर उपस्थित होते.