मुंबई : आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सर्व भाजप आमदारांची नियोजित बैठक असताना गिरणी कामगारांनी वर्षा बंगल्यावर धडक दिली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावी यासाठी गिरणी कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांकडून आंदोलक गिरणी कामगारांना वर्षा बंगल्याच्या प्रवेशद्वाराबाहेरच रोखण्यात आले.


दरम्यान वर्षा बंगल्याबाहेर पोलीस आणि आंदोलक गिरणी कामगारांमध्ये हुज्जत सुरु होती. त्यावेळी वर्षा बंगल्यात आत जाणाऱ्या एकाही भाजप मंत्र्याने किंवा भाजपच्या आमदाराने मध्यस्थी करून गिरणी कामगारांचे म्हणणे ऐकून घेण्याचे सौजन्य दाखवले नाही. त्यांनी गोंधळाकडे कानाडोळा करून सरळ वर्षा बंगल्याची वाट धरली.

मुख्यमंत्र्यांनी आमदार प्रसाद लाड यांना गिरणी कामगारांसोबत चर्चा करण्यासाठी पाचारण केले आहे. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर गिरणी कामगार आणि लाड यांच्यात चर्चा झाली.

काय आहेत मागण्या?
दीड लाख घरांचा प्रश्न प्रलंबित आहे
आतापर्यंत केवळ 11 हजार गिरणी कामगारांना लॉटरी लागली असून त्यापैकी 9 हजाराहून अधिक कामगारांना अध्याप घरं मिळाली नाहीत.
पनवेल, तळोजा इथल्या घरांची लॉटरी काढण्यात यावी या मागणीसाठी अनेक बैठका झाल्या तरीही अध्याप निर्णय झालेला नाही.