Mumbai Measles Break : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गोवरचा संसर्ग (Measles in Mumbai) कायम आहे. गोवरचा उद्रेक थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. दररोज गोवरचे नवीन रुग्ण समोर येत आहेत. गोवंडीत गोवर संसर्गामुळे पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत आतापर्यंत गोवर संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या नऊ वर पोहोचली आहे. राज्यातील गोवरचा उद्रेक दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा गोवर संसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 


मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवर संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 475 वर पोहोचली आहे. शुक्रवारी मुंबई शहरात पाच मृत्यूही झाले आहेत, हे मृत्यू गोवर संसर्गामुळे झाले आहेत का याचा अहवाल येणं बाकी आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 10 डिसेंबरपर्यंत राज्यात राज्यात आतापर्यंत 17 बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला होता.


गोवंडीमध्ये चिमुकल्याचा गोवरमुळे मृत्यू


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोवंडी परिसरात 13 डिसेंबर रोजी एका पाच महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला होता, त्याचा अहवाल शुक्रवारी आला. या अहवालात या चिमुकल्याचा मृत्यू गोवरामुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. शुक्रवारी गोवर संसर्गामुळे 37 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर 26 मुलांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या 26 मुलांवर आरोग्य प्रशासनाकडून लक्ष ठेवलं जात आहे. सध्या ही बालकं पूर्णपणे निरोगी आहे.


2021 मध्ये 90 रुग्णांची नोंद


एका आकडेवारीनुसार, 2021 मध्ये जगभरात गोवरची अंदाजे 9 दशलक्ष प्रकरणे नोंदवली गेली होती आणि 1,28,000 मृत्यू झाले. 22 देशांना गोवरच्या मोठ्या उद्रेकाचा सामना करावा लागला. लसीकरणातील अभाव, गोवर रुग्णांच्या देखरेखीमधील अभाव आणि कोरोनामुळे गोवर लसीकरणात आलेले अडथळे आणि विलंब यामुळे 2022 मध्ये गोवरचा मोठ्या प्रमाणात उद्रेक पाहायला मिळत आहे. भारतासोबतच जगातील प्रत्येक देशांमध्ये गोवरचा धोका आहे.


केंद्र सरकारचा राज्यांना सल्ला


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील गोवर प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गोवर संसर्गामध्ये होणारी वाढ ही सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून विशेष चिंतेची बाब आहे. केंद्र सरकराने राज्यांना प्रतिबंधात्मक तयारी आणि गोवरचा प्रादुर्भाव नियोजनपूर्वक हाताळण्यासाठी सल्ला दिला आहे.