मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) स्कॉर्पिओ कार चोरी आणि मनसुख हिरेन यांच्या कथित खून प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेण्याची शक्यता सुत्रांनी दिली आहे. एनआयए सध्या मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या 20 जिलिटीन सोबत स्कॉर्पिओ कारच्या प्रकरणाचा तपास करत आहे.


स्कॉर्पिओ कार चोरी प्रकरण आणि मनसुख हिरेन कथित खून प्रकरण एकमेकांशी संबंधित असल्याचे समोर आल्यास या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयए स्वतःकडे घेण्याची शक्यता आहे. एनआयए कायद्याच्या कलम 8 नुसार एनआयएला कनेक्टेड गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार आहे.


स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP)


जेव्हा एखादे प्रकरण एका एजन्सीकडून दुसर्‍या एजन्सीकडे वर्ग केले जाते तेव्हा त्या तपासणीपूर्वी संलग्न तपास अधिकाऱ्यांना बोलविले जाते.


या प्रकरणातील तपास प्रथम गुन्हे शाखेच्या सीआययूकडे होता, ज्याचे तपास अधिकारी एपीआय सचिन वाझे होते. दरम्यान त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत, ज्यामुळे त्यांना एनआयएने बोलावले आहे.


सीआययूनंतर तपासाची जबाबदारी गुन्हे शाखेचे एसीपी नितीन अलकनुरे यांना देण्यात आली होती, त्यामुळे या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला यासाठी त्यांनाही बोलवण्यात आले होते. 


महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास एटीएसकडे हस्तांतरित केला होता. त्यानंतर एटीएसचे एसीपी श्रीपाद काळे यांना चौकशीचे काम देण्यात आले होते. त्यांच्याकडे चौकशीचा फक्त एक दिवस होता आणि त्यानंतर हा खटला पुढील तपासासाठी एनआयएकडे वर्ग करण्यात आला. त्या एका दिवसाच्या तपासणीत त्यांना काय सापडले हे जाणून घेण्यासाठी एनआयएने त्यांनाही बोलावले आहे.


मनसुख हिरेन यांच्या मृत्यू सारख्या मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी एटीएस प्रसिद्ध आहे. मात्र, अजूनही एटीएसच्या हातात हवे तसे पुरावे आणि माहिती मिळाली नसल्याचे समजते आहे. मनसुख यांच्या मोबाईलचे लोकेशन वसई येथे कसे मिळाले? त्यांचे आणि सचिन वाझे यांचे नेमके काय संबंध होते? त्यांच्या तोंडावर इतके रुमाल का बांधण्यात आले होते? आणि महत्वाचे म्हणजे मनसुख यांची हत्या आहे की आत्महत्या या सर्व प्रश्नांची उत्तरे एटीएसला अजून सापडलेली नाहीत.