मुंबई : मराठा आंदोलकांना अन्न पाणी मिळू नये म्हणून खाऊ गल्ली बंद केल्या, तसेच स्वच्छतागृहेही मिळू नयेत अशी व्यवस्था केली असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. हे सरकार म्हणजे इंग्रजांपेक्षा बेकार आहे, मराठ्यांच्या मुलांना वाईट वागणूक मिळत आहे असंही ते म्हणाले. मराठ्याची मुलं माज आणि मस्ती घेऊन आले नाहीत तर मोठ्या वेदना घेऊन मुंबईत आले आहेत, त्याची सरकारने जाण ठेवावी असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं.


मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं असून त्यांना आणखी एक दिवसाची परवानगी दिली आहे. त्यानंतर मनोज जरागेंनी सरकारला आरक्षण देण्याचं आवाहन केलं. या सरकारने जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर मराठ्याची पोरं आयुष्यभर विसरणार नाहीत असं मनोज जरांगे म्हणाले.


सरकारने हॉटेल बंद केली, पाणीही मिळू दिलं नाही


मनोज जरांगे म्हणाले की, "आम्ही आरक्षणासाठी आंदोलन करतोय, पण या ठिकाणची खाऊ गल्ली, हॉटेल बंद करण्यात आले, पाण्याचीही सोय करण्यात आली नाही. आंदोलकांना चहा-पाणी, जेवण मिळू नये म्हणून हे सगळे करण्यात आलं. त्यांना स्वच्छतागृहे मिळू नयेत यासाठी प्रयत्न केलं. आम्ही सरकारशी सहकार्य केलं, त्यांच्या नियमांचे पालन केलं. पण हे सरकार इंग्रजांपेक्षा बेकार आहे. सरकारने आडमुठेपणा केला तर आम्हीही आडमुठेपणा करणार."



सरकारच मराठा-ओबीसी वाद लावत आहे


राज्य सरकार मराठा आणि ओबीसींमध्ये वाद लावत असल्याचा आरोप मनोज जरांगे म्हणाले. ते म्हणाले की, "आम्ही कधीच असं म्हटलं नाही की ओबीसींचे काढून घ्या आणि आम्हाला द्या. आमच्या नोंदी या 150 वर्षांपूर्वीच्या आहेत. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटमध्ये तशा नोंदी आहेत. त्यामुळे आम्ही कुणाचंही काढून घेत नाही तर ते आमच्या हक्काचं आहे. उलट आमच्याच हक्काचं काढून घेऊन इतरांना दिलंय. अशा प्रकारचं वक्तव्य करुन सरकारच मराठा आणि ओबीसींमध्ये वाद लावत आहे."


मी तर संपणार नाहीतर आरक्षण तरी घेणार


ही लढाई आता आरपारची आहे, मागे हटणार नाही. एकतर सरकारला आरक्षण द्यावं लागेल किंवा उपोषण करुन मी तरी मरणार, पण मागे हटणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले. आता फक्त आरक्षण घेणार नाही तर त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले.



देवेंद्र फडणवीसांचे काय कर्तृत्व?


देवेंद्र फडणवीस आम्हाला महाराष्ट्राचे संस्कार काय ते शिकवतात, पण त्यांचे कर्तृत्व काय हे त्यांनी सांगावं असं जरांगे म्हणाले. ते म्हणाले की, "फडणवीसांनी धनगरांना फसवलं आणि अजून आरक्षण दिलं नाही. कैकाडी समाज हा पश्चिम महाराष्ट्रात अनुसूचित जातीत आहे, मराठवाड्यात ओबीसी आहे. तर इतर ठिकाणी वेगळ्याच प्रवर्गात आहे. कैकाडी समाज एकाच राज्यात तीन प्रवर्गात आहे हे फडणवीसांचे कर्तृत्व. मराठ्याची एक मुलगी ओबीसी आणि दुसरी जनरल प्रवर्गात, हे तुमचं कर्तृत्व. शेतकरी आत्महत्या करतात हे फडणवीसांचा कर्तृत्व."


देवेंद्र फडणवीसांनी अंतरवालीत आंदोलनाला बसलेल्या आया-बहिणींना जर मारलं नसतं तर आम्ही त्यांच्यावर बोललो नसतो. त्या आया-बहिणींवर गुन्हेही यांनी दाखल केले असं जरांगे म्हणाले.



राज्यपाल कोट्यातून आमदारकीसाठी धडपड


राज्यपालांच्या कोट्यातून आमदारकी मिळवण्यासाठी काही मराठ्यांवर लोक बोलतात. त्यामागे त्यांचे काहीही कर्तृत्व नाही असं म्हणत मनोज जरांगे यांनी भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनाही टोला लगावला.


देवेंद्र फडणवीसांनी एखाद्याला आमदाकरी दिली नाही तर तो तुमच्यावर रुसेल, पण गोरगरीब मराठ्यांना आरक्षण दिलं तर तो आयुष्यभर तुम्हाला लक्षात ठेवेल असं मनोज जरांगे म्हणाले.