मालवणी तिहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं, तिघे अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 26 Jun 2016 06:02 AM (IST)
मुंबई : मुंबईच्या मालवणी परिसरात झालेल्या तिहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात क्राईम ब्रँचला यश आलं आहे. आजी आणि दोन नातवंडाच्या हत्येप्रकरणी एक महिला आणि दोन पुरुषांना अटक झाली आहे. संपत्तीच्या वादातून हे हत्याकांड घडवून आणल्याची प्राथमिक माहिती आहे. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी गुजरातच्या वलसाडमधून तीन आरोपींना अटक केली आहे. इमरान, सलमान आणि सलमानची पत्नी अनम यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुरुवारी न्यू कलेक्टर कॉलनीत प्लॉट नंबर 23 वर रुम नंबर 92 मध्ये राहणाऱ्या शॉ कुटुंबीयांमध्ये तिहेरी हत्याकांड घडलं होतं. तीक्ष्ण चाकूने वार करुन तिघांचा खून करण्यात आला होता. 47 वर्षीय बबली शॉ यांच्यासह त्यांचा 13 वर्षांचा नातू आर्यन इस्माईल शेख आणि 8 वर्षांची नात सानिया इस्माईल शेख यांची हत्या झाली होती.