छत्रपती संभाजीनगर:  छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) वज्रमूठ सभेनंतर (Vajramuth Sabha) महाविकास आघाडी आता मुंबईत वज्रमूठ आवळणार आहे. महाराष्ट्र दिनी  मुंबईत महाविकास आघाडीची सभा होणार आहे.  या सभेत महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, 


महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाचं सरकार विरोधात महाविकास आघाडीने वज्रमूठ आवळली आहे. 1 मे ला महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची मुंबईत सभा होणार आहे. मुंबईतल्या बीकेसी मैदानात महाविकास आघाडी  शक्तीप्रदर्शन  करणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा याच बीकेसी मैदानात पार पडला होता. आता  महाविकास आघाडी महाराष्ट्र दिनी  शिंदे सरकारवर हल्लाबोल करणार आहे


गडकरी आणि फडणवीसांच्या होमग्राऊंडवर सभा


नागपूरमध्ये महाविकास आघाडीची 16 एप्रिलला वज्रमुठ सभा होणार आहे.. दरम्यान या सभेसाठी दर्शन कॉलनी सद्भावना नगर येथील मैदानाची निवड करण्यात आली आहे.  मात्र राजकीय सभेमुळे खेळाडूंची गैरसोय होईल असं कारण देत स्थानिक नागरिकांनी या मैदानावर सभा घेण्यास विरोध दर्शवलाय.  दरम्यान दर्शन कॉलनीतले नागरिक आंदोलन करणार आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. भाजपचे स्थानिक आमदार कृष्णा खोपडे यांनी मैदानाची मालकी असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासला हे मैदान महाविकास आघाडीच्या सभेसाठी देण्यात येऊ नये असे पत्र पाठवले होतं.  त्यामुळे मविआच्या सभेआधीच नागपुरात राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे.


राज्यभरात महाविकास आघाडीच्या 16 सभा 


महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाचं सरकार विरोधात र महाविकास आघाडीने वज्रमूठ आवळली आहे. राज्यभरात महाविकास आघाडीच्या 16 सभा होणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली.  या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.


महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वज्रमुठ सभेत सांगितले. महाविकास आघाडीचा कणा असणारे कार्यकर्ते जीवाचे रान करतील, असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. आता पेटून उठावे लागेल, एकाच हातात घड्याळ पंजा आणि मशाल आहे. हा एकोपा टिकविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करणार आहोत, आपणही एकोपा टिकवा, असे आवाहन त्यांनी केले.