Maharashtra Kalyan News : कोरोना आटोक्यात आल्यानं राज्य शासनानं मुंबई शहर-उपनगर, पुणे- रायगडसह 14 जिल्ह्यातील निर्बंध 4 मार्चपासून शिथिल केले आहेत. त्याच धर्तीवर कोरोनाचा कमी झालेला आलेख लक्षात घेऊन कल्याण डोंबिवली मधील निर्बंध देखील हटवण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. या संदर्भात आमदार राजू पाटील यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. 


राज्य शासनानं 4 मार्चच्या मध्यरात्रीपासून मुंबईसह अन्य जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. तेथील सामाजिक, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकिय, धार्मिक कार्यक्रम, सभागृह किंवा मैदानाच्या 100 टक्के क्षमतेनं घेण्यास या निर्णयाद्वारे परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर लग्न सोहळे आणि अंत्यसंस्कारांना लावण्यात आलेले निर्बंधही हटविण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल करताना पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे 90 टक्केपेक्षा अधिक प्रमाण, दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण 70 टक्के पेक्षा जास्त, पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्केपेक्षा कमी, आयसीयूमधील ऑक्सिजन बेड 40 टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात भरलेले असणं, असं निकष लावण्यात आले आहेत. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यांचा विचार करण्यात आला आहे.  मात्र उपरोक्त नियमांचा फटका ठाणे जिल्ह्याला सर्वात जास्त बसला आहे. 


डोंबिवली, कल्याण शहरं मुंबई लगत असताना आणि नियमात बसूनसुध्दा निर्बंध शिथिल करण्यात आले नाहीत. या दोन्ही शहरांमध्ये लसीकरण योग्य झालेले आहे. वास्तविक डोंबिवली हे सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहर मानलं जातं. दरवर्षी हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त विविध ठिकाणी निघणाऱ्या शोभा यात्रांची सुरुवात डोंबिवलीमध्येच झाली आहे. तब्बल दोन वर्षानंतर डोंबिवलीकर शोभायात्रा काढण्यासाठी उत्सुक होते. परंतु निर्बधांमुळे परवानगी नसल्यानं डोंबिवलीकरांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे नियम न लावता या दोन्ही शहरांमध्ये सवलत देण्याची मागणी, मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्ह्याधिकारी डॉ.राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mumbai Corona Update : मुंबईत मंगळवारी 50 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 60 जण कोरोनामुक्त


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha