मुंबई : कोरोना संकटामुळे लॉकडाऊन झालेल्या जनतेला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिलासा देण्याच प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडी सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य रेशनदुकानावर मोफत उपलब्ध करुन देण्याची सोय केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली असून या संचारबंदीच्या काळात गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.


गरीब आणि गरजू लोकांना लॉकडाऊनमध्ये अन्न धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून रेशन दुकानावर तीन महिन्यांचे रेशन दिले जाणार आहे. त्यासाठी मुंबईतील रेशन दुकानांची यादी मोबाईल नंबरसह देण्यात आली आहे. शिवाय रेशनकार्ड नसले तरी लॉकडाऊनमध्ये अन्न धान्याशिवाय उपासमारीची वेळ कुठल्याही कुटुंबावर येवू नये म्हणून एक फॉर्म भरण्यासाठी रेशन दुकानावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फॉर्म भरुन प्रत्येकाला आता मोफत अन्न धान्य मिळणार आहे.



दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत एकही गरीब उपाशी राहू नये यासाठी केंद्र सरकारने देखील व्यवस्था केल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे दोन प्रमुख भाग करण्यात आले आहेत. पहिल्या भागात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटी गरिबांना कवच मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पुढील तीन महिन्यांपर्यंत गरिबांना 5 किलो अतिरिक्त गहू किंवा तांदूळ मोफत मिळणार आहे. याचा फायदा 80 कोटी लोकांना होणार आहे. याशिवाय एक किलो डाळ मोफत मिळणार आहे.

योजनेअंतर्गत आठ विभागांमध्ये शेतकरी, मनरेगा, गरीब विधवा-निवृत्त कर्मचारी-दिव्यांग, जनधन योजना-उज्ज्वला योजना, सेल्फ हेल्प ग्रुप (महिला), ऑर्गनाइज्ड सेक्टर वर्कर्स (EPFO),कन्स्ट्रक्शन वर्कर्स यांना डीबीटीला फायदा मिळणार आहे. वयोवृद्ध, दिव्यांग आणि विधवांना पुढील तीन महिन्यात 1000 रुपये दोन हफ्त्यात दिले जाणार आहेत.

गरिबांना 1.70 लाख कोटींचं पॅकेज; अर्थमंत्र्यांची घोषणा



भारतात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे देशात सहा जणांना आपला प्राण गमवावे लागले आहे. तर 106 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात एकूण 1100 हून जास्त जणांना कोरोनाची लागण झाली असून आज घडीला देशात 1136 कोरोनाग्रस्त आहेत. तर महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 215 वर पोहोचला आहे